

नवी दिल्ली : येत्या १ नोव्हेंबरपासून बँक ग्राहकांना त्यांच्या खात्यांमध्ये कमाल चार नॉमिनी ठेवता येणार आहेत. या नियमामुळे संपूर्ण बँकिंग प्रणालीत दाव्यांच्या निकाली प्रक्रियेत एकसमानता आणि कार्यक्षमता सुनिश्चित होईल, असे केंद्रीय अर्थ खात्याने सांगितले.
बँकिंग कायदे (दुरुस्ती) अधिनियम, २०२५ अंतर्गत नॉमिनीशी संबंधित प्रमुख तरतुदी १ नोव्हेंबर २०२५ पासून लागू होतील. हा अधिनियम १५ एप्रिल २०२५ रोजी अधिसूचित केला होता.
यात एकूण पाच कायद्यांमधील १९ दुरुस्त्या आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा, १९३४ बँकिंग नियमन कायदा, १९४९, स्टेट बँक ऑफ इंडिया कायदा, १९५५; आणि बँकिंग कंपन्या (अधिग्रहण व हस्तांतरण) कायदा, १९७० व १९८० या कायद्यातील दुरुस्त्यांनुसार, ग्राहक एकाचवेळी किंवा क्रमवार पद्धतीने चार व्यक्तींचे नामनिर्देशन करू शकतील. ज्यामुळे ठेवीदार आणि नामनिर्देशित दोघांसाठी दावे निकाली काढणे अधिक सोपे होईल. ठेवीदारांना आपल्या पसंतीनुसार एकाचवेळी किंवा क्रमवार नामनिर्देशन करण्याची मुभा असेल.