
नवी दिल्ली : चीनकडून महत्त्वाची उत्पादने आणि यंत्रसामग्रीच्या निर्यातीवरील निर्बंधांमुळे भारतातील इलेक्ट्रॉनिक्स, सौरऊर्जा, आणि इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) क्षेत्रातील कंपन्यांना विलंब आणि अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे, असे आर्थिक विचारमंच ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह (जीटीआरआय)ने गुरुवारी सांगितले. भारताने चिनी गुंतवणूक आणि व्हिसांवर घातलेल्या निर्बंधांना चीनकडून दिलेले हे प्रत्युत्तर असू शकते, असेही ‘जीटीआरआय’ने स्पष्ट केले.
चीनच्या प्रत्त्युत्तराने आता अधिक नव्याने राजकीय तणाव आणि व्यापारयुद्धाचे संकेत मिळते. भारतावरील विशिष्ट निर्बंध लवकरच संपावेत, अशी आमची अपेक्षा आहे, कारण ते चीनलाही हानी पोहोचवतील, असे ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्हचे संस्थापक अजय श्रीवास्तव यांनी म्हटले आहे.
ते पुढे म्हणाले की, या उपाययोजनांमुळे भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स, सौरऊर्जा आणि ईव्ही क्षेत्रांवर परिणाम होत असला तरी त्या चीनच्या स्वतःच्या उत्पादन आणि निर्यात क्षेत्रालाही हानी पोहोचवत आहेत. भारतातील इलेक्ट्रॉनिक्स, सौरऊर्जा आणि ईव्ही क्षेत्रातील कंपन्या विलंब आणि अडथळ्यांचा सामना करत आहेत, कारण चीन उत्पादने आणि यंत्रसामग्रीच्या निर्यातीवर निर्बंध घालत आहे, असे त्यांनी नमूद केले.
भारताने चीनकडून होणाऱ्या अवास्तव मागण्यांविरोधात ठाम राहून स्थानिक उत्पादन क्षमता वाढवण्यावर आणि पुरवठा साखळीचे विविधीकरण करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले.
जपान आणि दक्षिण कोरियासोबत भागीदारी मजबूत करावी
भारताने देखील जपान आणि दक्षिण कोरियासोबत भागीदारी मजबूत करावी जेणेकरून इलेक्ट्रॉनिक्स, सोलर पॅनेल आणि इलेक्ट्रिक वाहनांसाठी उच्च-गुणवत्तेचे घटक मिळवता येतील. या देशांशी सहयोग केल्यामुळे भारताला चीनवरील अवलंबित्व कमी करण्यास आणि अधिक लवचिक पुरवठा साखळी निर्माण करण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले. अमेरिकेचे नवे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीनवर नवीन शुल्क लादण्याची शक्यता आहे, त्याचबरोबर बीजिंगने महत्त्वाच्या खनिज पदार्थांवर आणि उच्च-तंत्रज्ञान उपकरणांवर निर्यात निर्बंध लादले आहेत.