

नागपूर : येत्या दोन वर्षांत भारतीय उद्योगक्षेत्रातील महत्त्वाचा असा लॉजिस्टिक खर्च २ टक्क्यांवर आणण्याचे सरकारचे प्रयत्न असून आर्टिफिशिअल इंटेलिजन्सद्वारे भारतीय उद्योगातील लॉजिस्टिक खर्च, पॅकेजिंग, उत्पादन, वेळेवर वितरण आणि उत्पादन व सेवेचा पुरवठा यामधे महत्त्वाचे बदल होऊन भारतीय उद्योगक्षेत्र जागतिक स्तरावर आपली वेगळी अशी ओळख निर्माण करतील असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मटेरियल मॅनेजमेंट, नागपूर शाखेतर्फे आयोजित ‘रेवॉल्युशनिंग सप्लाय चेन विथ आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ या परिषदेला ते संबोधित करत होते.
भारतीय उद्योगाला आपली वितरण प्रणाली अजून विकसित करून वेळेला सर्वधिक महत्त्व या तत्त्वाला प्राथमिकता दिली पाहिजे. कालबद्ध वितरण उत्तम पॅकेजिंग लॉजिस्टिक आणि साठवण्याची क्षमता व सर्वच घटकांवर उद्योगविश्वाने लक्ष देणे गरजेचे आहे, असे गडकरींनी याप्रसंगी नमूद केले.
उत्पादन वितरण मालपुरवठा या क्षेत्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रणाली राबविण्यासाठी त्या क्षेत्रातील अधिकारी-कर्मचारी तंत्रज्ञान यांना योग्य असे मार्गदर्शन आणि प्रशिक्षण दिले तरच ही प्रणाली उत्तम रित्या काम करू शकेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रणाली ही उद्योग विश्वाची संरचना बदलत असून पारंपरिक पुरवठा पद्धतींमध्ये आमूलाग्र बदल घडवीत आहे. भारतीय उद्योग विश्वापुढे जागतिक आवाहने असून आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रणाली ही या आवाहने सहजरीत्या हाताळत असून उद्योगव्यवस्थापन क्षेत्रात अचूक निर्णय घेण्याची क्षमता विकसित करत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रणाली ही उद्योग क्षेत्रात सुलभता आणण्यासोबतच सबंधित उद्योग क्षेत्राचे कार्बन फूटप्रिंट कमी करण्यात सुद्धा मदत करत असल्याचे गडकरीनी यावेळी स्पष्ट केले.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मटेरियल मॅनेजमेंट, नागपूर शाखेतर्फे आयोजित रेवॉल्युशनिंग सप्लाय चेन विथ आर्टिफिशियल इंटेलिजन्स या दोन दिवसीय परिषदेमधून पारंपरिक पुरवठा पद्धतीमधे आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रणालीद्वारे शाश्वत, विकसित, बहुआयामी अशे मुद्दे चर्चिले जातील असा विश्वास इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मटेरियल मॅनेजमेंट नागपूरचे संचालक डॉ. व्यंकटरामन यांनी व्यक्त केला.