
नवी दिल्ली : प्रमुख जागतिक बाजारपेठेतील उत्तम मागणीमुळे चालू आर्थिक वर्षात देशातील चामड्याची आणि पादत्राणांची निर्यात १२ टक्क्यांहून अधिक वाढून ५.३ अब्ज डॉलरवर जाण्याची शक्यता आहे, असे ‘सीएलई’चे अध्यक्ष राजेंद्र कुमार जालान यांनी सांगितले.
ते असेही म्हणाले की, अमेरिकेसह अनेक जागतिक कंपन्या भारतात उत्पादन कंपन्या स्थापन करण्यास उत्सुक आहेत. २०२३-२४ मध्ये आमची निर्यात ४.६९ अब्ज डॉलर होती आणि या आर्थिक वर्षात ती ५.३ अब्ज डॉलरपर्यंत वाढण्याची आमची अपेक्षा आहे. येत्या काही महिन्यांसाठी ऑर्डर बुक्स चांगली आहेत, असे जालान म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, अमेरिका आणि यूकेकडून प्रचंड मागणी येत आहे. भारतीय निर्यातदार आफ्रिकेतही व्यवसायाच्या संधी शोधत आहेत. हा उद्योग सुमारे ४२ लाख लोकांना रोजगार देतो. या क्षेत्राची एकूण उलाढाल सुमारे १९ अब्ज अमेरिकन डॉलर आहे, ज्यामध्ये ५ अब्ज डॉलर निर्यातीचा समावेश आहे. या क्षेत्रामध्ये २०३० पर्यंत ४७ अब्ज डॉलरची एकूण उलाढाल गाठण्याची क्षमता आहे, ज्यामध्ये २५ अब्ज डॉलरचे देशांतर्गत उत्पादन आणि १३.७ अब्ज डॉलरची निर्यात उलाढाल समाविष्ट आहे, असे जालान म्हणाले.
त्यांनी सरकारला विनंती केली की उत्पादन-लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम (पीएलआय) या क्षेत्रापर्यंत वाढवावी कारण ती ४७ अब्ज डॉलरपर्यंत निर्यात लक्ष्य साध्य करण्यात मदत करेल आणि सुमारे ७-८ लाख लोकांसाठी अतिरिक्त रोजगार निर्माण करेल.