महाराष्ट्रात जगप्रसिद्ध कार कंपनी करणार ३००० कोटींची गुंतवणूक , उद्योगमंत्री उदय सामंतांची माहिती

राज्यातील अनेक प्रकल्प गुजरात किंवा अन्य राज्यात स्थलांतरित होत असतानाच हा प्रकल्प राज्यात आल्यानं रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.
महाराष्ट्रात जगप्रसिद्ध कार कंपनी करणार ३००० कोटींची गुंतवणूक , उद्योगमंत्री उदय सामंतांची माहिती
Published on

मुंबई: गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातील अनेक मोठे प्रकल्प परराज्यात गेल्यामुळं जनतेत नाराजी होती. गेल्याच महिन्यात ६०,००० कोटींचा 'गेल' (GAIL) प्रकल्प मध्यप्रदेशात गेला. याशिवाय पुण्यातील ३५ आयटी कंपन्या पुण्यातून परराज्यात स्थलांतरीत होणार असल्याची माहिती समोर आली होती. या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेसाठी सकारात्मक बातमी आहे. जर्मन कार निर्माता कंपनी मर्सिडीझ बेंझ महाराष्ट्रात ३००० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी एक्स (पूर्वीचे ट्वीटर) प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत ही माहिती दिली. या प्रकल्पामुळं राज्यात रोजगाराच्या संधी निर्माण होण्यास मदत होईल, असं उदय सामंत म्हणाले. हा प्रकल्प नेमका कुठं होणार, हे स्पष्ट नसलं, तरी पुण्यातील चाकणमध्ये हा प्रकल्प होण्याची शक्यता आहे.

राज्यात रोजगाराच्या संधी निर्माण होणार: उदय सामंत

उदय सामंत यांनी एक्स पोस्ट मध्ये म्हटलं आहे की, "आज जर्मनी दौऱ्यावर असताना मर्सिडिझ बेंझ कंपनीच्या प्रतिनिधींसोबत बैठक झाली. मर्सिडिझ बेंझ ही कंपनी यावर्षी महाराष्ट्रामध्ये ३००० कोटींची गुंतवणूक करणार आहे. यामुळे महाराष्ट्रात उद्योगधंद्यांसह रोजगारात मोठ्या संख्येने वाढ होणार आहे. यासंदर्भात आज चर्चा झाली. यावेळी मर्सिडीज कंपनीचे मर्सिडीज-बेंझ ग्रुप ऑफ मॅनेजमेंट बोर्डाचे सदस्य डॉ. जोर्ग बर्झर, पॉलिटिकल ऑपरेशन्स - एक्सटर्नल अफेयर्स, मर्सिडीज-बेंझ ग्रुप एजी संचालक मरिना क्रेट्स, विक्री आणि विपणन, प्रदेश ओव्हरसीज, मर्सिडीज-बेंझ ग्रुप एजी संचालक मार्टिन शुल्झ, मर्सिडीज-बेंझ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कार्यकारी संचालन प्रमुख व्यंकटेश कुलकर्णी आदी उपस्थितीत होते."

'एथर एनर्जी' छत्रपती संभाजीनगरमध्ये उभारणार १ हजार कोटींचा प्रकल्प: बंगळुरू स्थित एथर एनर्जी छत्रपती संभाजीनगरमध्ये आपला प्रकल्प उभारणार आहे. कंपनी या प्रकल्पासाठी १ हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. ही कंपनी प्रामुख्यानं इलेक्ट्रिक स्कूटर बनवते.

महायुतीला होणार फायदा-

गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातून अनेक प्रकल्प राज्याबाहेर, त्यातही गुजरातला गेल्यामुळं राज्य सरकार टीकेचं धनी झालं होतं. विरोधकांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली होती. त्याचा काहीसा फटका महायुतीला लोकसभा निवडणूकीला बसला होता. आता येत्या तीन-चार महिन्यांमध्ये राज्यात विधानसभा निवडणूका होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर हा प्रकल्प आल्यानं महायुतीला फायदा होऊ शकतो.

logo
marathi.freepressjournal.in