

मुंबई : मुंबई ही भारताची ‘कन्व्हेन्शन कॅपिटल’ म्हणून उदयास येत आहे. बांद्रे परिसरात ‘ताज’ ग्रुपच्या नव्या आणि अत्याधुनिक हॉटेलमधील आधुनिक कन्व्हेन्शन सेंटरमुळे मुंबईतील व्यावसायिक संधी अधिक वाढतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
‘ताज’ ग्रुपच्या बांद्रे परिसरातील नव्या आणि अत्याधुनिक हॉटेलचे भूमिपूजन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. या प्रसंगी टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन, माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशीष शेलार, माजी मंत्री दीपक केसरकर, इंडियन हॉटेल्सचे सीईओ पुनीत चटवाल तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी इंडियन हॉटेल्स आणि टाटा समूहाचे अभिनंदन केले.
नागपूरमध्येही अत्याधुनिक सुविधांसह हॉटेल उभारण्याचा टाटा ग्रुपचा विचार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. याप्रसंगी टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी मनोगत व्यक्त केले, तर इंडियन हॉटेल्सचे सीईओ पुनीत चटवाल यांनी प्रास्ताविक केले.
१९९३मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेत बॉम्बस्फोट झालेल्या ठिकाणांपैकी एक असलेल्या सी रॉक हॉटेलमध्ये एकेकाळी दोन एकर जमिनीच्या भूखंडावर नवीन हॉटेल तयार होत आहे. आयएचसीएलने ६८० कोटी रुपयांना मालमत्ता विकत घेतली आणि इमारत पूर्णपणे पाडली.
छटवाल म्हणाले की गुंतवणुकीत जमिनीची किंमत समाविष्ट आहे आणि काही किरकोळ वगळता विकासासाठी सर्व आवश्यक परवानग्या मिळाल्या आहेत.
मुंबईत नवीन हॉटेल उभारण्यासाठी २.५ कोटींची गुंतवणूक
टाटा समूह संचालित इंडियन हॉटेल्स कंपनीने सोमवारी मुंबईत ३३० खोल्यांची नवीन मालमत्ता विकसित करण्यासाठी रु. २,५०० कोटी गुंतवणुकीची घोषणा केली.‘ताज बॅण्डस्टॅण्ड’ या नवीन मालमत्तेचे बांधकाम या वर्षी सुरू होणार आहे आणि ते पूर्ण होण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी लागण्याची अपेक्षा आहे, असे ‘आयएचसीएल’चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी पुनीत छटवाल यांनी सांगितले. या सुविधेमुळे १,००० लोकांसाठी थेट रोजगार निर्माण होईल, तर कॅब ड्रायव्हर्स यांसारख्या अप्रत्यक्ष लोकांना एकूण रोजगार ७ हजारांपेक्षा जास्त होईल, असे ते म्हणाले.