

नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्ष आणि पुढील आर्थिक वर्ष २७ मध्ये किरकोळ महागाई दर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) च्या अंदाजापेक्षा खूपच कमी असण्याची शक्यता आहे, असे स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय)ने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे.
किमतीवरील दबाव कमी करण्यासाठी अनेक देशांतर्गत घटक काम करत असल्याचे अहवालात अधोरेखित केले आहे. त्यामध्ये मान्सूनची चांगली प्रगती, जास्त खरीप पेरणी, पुरेसा साठा, अन्नधान्याचा ‘बफर’ साठा आणि सर्वात महत्त्वाचा घटक- जीएसटी दर सुसूत्रीकरण यांचा समावेश आहे.
हे सर्व घटक लक्षात घेऊन आरबीआयने अलीकडेच आर्थिक वर्ष २६ मध्ये सीपीआय चलनवाढीचा अंदाज ५० आधार अंकांनी कमी करून २.६ टक्के केला आहे, जो एप्रिलमध्ये अंदाजित केलेल्या पातळीपेक्षा १६० आधार अंकांनी कमी आहे. तथापि, सकारात्मक देशांतर्गत वातावरणामुळे आर्थिक वर्ष २६ आणि आर्थिक वर्ष २७ मध्ये प्रत्यक्ष चलनवाढ आरबीआयच्या सुधारित अंदाजांपेक्षा खूपच कमी असू शकते, असे अहवालात म्हटले आहे.