"भाजप सरकारनं महाराष्ट्राला भोपळा दिला..." रोहित पवारांची अर्थसंकल्पावर टीका

देशाच्या तिजोरीत सर्वाधिक धन जमा करणाऱ्या महाराष्ट्राला सापत्न वागणूक दिल्याची टीका रोहित पवार यांनी केली.
"भाजप सरकारनं महाराष्ट्राला भोपळा दिला..." रोहित पवारांची अर्थसंकल्पावर टीका
Published on

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत मोदी ३.० सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात बिहार तसेच आंध्रप्रदेश या राज्यांना मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला आहे. मात्र महाराष्ट्राच्या बाबतीत कोणतीही विशेष घोषणा झालेली नाही. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एक्स (पूर्वीचे ट्वीटर) माध्यमावर पोस्ट करत सडकून टीका केली आहे. भाजप सरकारनं परंपरा कायम ठेवत महाराष्ट्राला भोपळा दिला, अशी रोहित पवार म्हणाले. आगामी विधानसभा लक्षात घेऊन तरी भरघोस निधीची अपेक्षा होती, मात्र देशाच्या तिजोरीत सर्वाधिक धन जमा करणाऱ्या महाराष्ट्राला सापत्न वागणूक दिल्याची टीका रोहित पवार यांनी केली.

भाजपा सरकारने महाराष्ट्राला भोपळा दिला...

रोहित पवार एक्स पोस्टमध्ये म्हणाले की, "देशाच्या तिजोरीत सर्वाधिक धन जमा करणाऱ्या महाराष्ट्राला कायमच सापत्न वागणूक देणारे भाजपा सरकार महाराष्ट्रातून पळवलेले प्रकल्प आणि येणारी विधानसभा लक्षात घेता किमान यंदा तरी भरघोस निधी आणि नवे प्रोजेक्ट देईल ही अपेक्षा होती. परंतु दुर्दैवाने भाजपा सरकारने आपली परंपरा कायम ठेवत महाराष्ट्राला भोपळा दिला.

कदाचित भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला महाराष्ट्रातील हवेचा अंदाज आला असेल आणि तसा अहवाल नुकताच महाराष्ट्रात येऊन गेलेल्या गृहमंत्र्यांनी दिला असेल. पवार साहेबांवर परवा झालेले आरोप महाराष्ट्रातील याच हवेचे द्योतक होते."

हे बजेट केवळ बिहार आणि आंध्रप्रदेश साठी होते का?

रोहित पवार एक्सपोस्टमध्ये पुढे म्हणाले की, "हे बजेट केवळ बिहार आणि आंध्रप्रदेश साठी होते का ? असा प्रश्न प्रत्येकालाच पडला असेल तरी बिहार आणि आंध्रच्या नेत्यांनी केलेल्या bargaining आणि पाठपुराव्याचे हे फलित म्हणावे लागेल. कदाचित महाराष्ट्राच्या नेत्यांनी देखील केवळ खुर्चीसाठी बार्गेनिंग न करता महाराष्ट्र हितासाठी थोडा जरी पाठपुरावा केला असता तर महाराष्ट्रासाठी एखादी घोषणा झाली असती. असो या बजेटने महाराष्ट्राला काही दिले नसले तरी तथाकथित चाणक्य आणि महाराष्ट्रातील सत्ताधारी नेत्यांची दिल्लीतली लायकी मात्र नक्कीच महाराष्ट्राच्या लक्षात आणून दिली आहे."

logo
marathi.freepressjournal.in