आपले दैनंदिन जीवन हे अनेक वेळा चहा, कॉफी, मिठाई किंवा बेकरी पदार्थांशिवाय अपूर्ण वाटते. साखर ही त्यामध्ये महत्त्वाचा घटक असते. पण एखाद्या पदार्थामध्ये सहजपणे मिसळणारी आणि चव वाढवणारी ही साखर आपल्या शरीरावर काय परिणाम करत आहे, याचा आपण खूप कमी वेळा विचार करतो.
साखरेमुळे वाढणाऱ्या समस्या
जास्त साखर खाल्ल्यामुळे वाढलेले वजन, फॅटी लिव्हर, मधुमेहाचा धोका, त्वचेसंबंधी समस्या, थकवा आणि लक्ष न लागणं यासारख्या अनेक समस्यांचं मूळ एकच, अत्याधिक साखर.
पण, जर एखाद्याने ठरवले की एक महिना साखर पूर्णपणे बंद करायची, तर? शास्त्रीय संशोधन सांगते की, हे पाऊल शरीरासाठी एक नवा टर्निंग पॉइंट ठरू शकते. साखर बंद केल्यास शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होऊ लागते, विशेषतः फॅटी लिव्हर असलेल्या रुग्णांना याचा विशेष फायदा होतो. मूत्रपिंडांचे कार्य सुधारते, हृदयावरील ताण आणि शरीरातील सूज (inflammation) हळूहळू कमी होते.
तसंच, साखर कमी केली तर मेंदू अधिक सुस्पष्ट काम करू लागतो. लक्ष लागायला मदत होते, आणि थकवा कमी जाणवतो. रोगप्रतिकारक शक्ती वाढते कारण साखर ही पांढऱ्या रक्तपेशींना कमकुवत करत असते. तसेच, शरीरात झिंक, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम यासारखे महत्त्वाचे खनिज अधिक टिकून राहतात.
म्हणूनच, जर तुम्हाला तुमचे आरोग्य खरंच सुधारायचे असेल, तर फक्त एक पाऊल उचलून बघा, साखर टाळा आणि फरक स्वतः अनुभवा!