सध्याच्या हेल्दी डाएट ट्रेंडमध्ये ‘फॅट फ्री’ गोष्टींना जास्त महत्त्व दिलं जातं. त्यामुळे अनेकजण पोळी, भात, किंवा भाजीत तूप घालणं टाळतात. पण लहानपणापासून आपल्या कानावर पडलेलं एक वाक्य,“तूप खाल्लंच पाहिजे!” कारण आपल्या रोजच्या जेवणातल्या पोळीवर किंवा डाळ-भातावर चमचाभर तूप हे फक्त चवीसाठी नसून आरोग्यासाठीही असते. याबद्दल अलीकडे आयुर्वेदाचार्य डॉ. मानसी मेहेंदळे धामणकर यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवरील व्हिडिओत तुपाच्या फायद्यांबद्दल सविस्तर सांगितलं आहे. त्यांच्या मते, दररोजच्या आहारात योग्य प्रमाणात शुद्ध तूप असणं अत्यंत आवश्यक आहे.
तूप फक्त चव वाढवत नाही, आरोग्यही जपते
आयुर्वेदाचार्य मानसी सांगतात, “तूप हे स्निग्ध गुणाचं आहे आणि जितकं जुना तितकं अधिक उत्तम. यात ब्युटीक ऍसिड असतं, जे पचन प्रक्रियेला गती देतं. गरम गरम पोळी किंवा आमटीमध्ये तूप घेतल्यास ते कोलेस्ट्रॉल वाढवत नाही. शिवाय, तळपायाला तूप चोळल्याने शरीरातील ज्वर कमी होण्यास मदत होते. रात्री झोपण्यापूर्वी गरम पाण्यासोबत एक चमचा तूप घेतल्यास पोट साफ होण्यास मदत होते.
तूप केवळ पचनासाठीच नाही तर पोषणासाठीही महत्त्वाचं आहे. डॉ. मेहंदळे सांगतात की, तुपामध्ये नैसर्गिकरित्या विटामिन A आणि D असतात, जे शरीरासाठी आवश्यक आहेत. डॉ. मेहंदळे यांच्या मते, दररोजच्या आहारात योग्य प्रमाणात शुद्ध तूप असणं पचन सुधारतं, आरोग्य चांगलं ठेवतं आणि एकूणच शरीराला ऊर्जा देतं.
(Disclaimer: ही माहिती डॉ. मानसी मेहंदळे यांच्या इन्स्टाग्रामवरील व्हिडिओवर आधारित आहे. यामध्ये दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. याची ‘नवशक्ति’ पुष्टी करत नाही.)