

आज महाराष्ट्रात भक्तीभावाने माघी गणेश जयंती साजरी केली जात आहे. हिंदू धर्मात गणपती बाप्पाला अत्यंत महत्त्व आहे. प्रत्येक शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी त्यांची पूजा केली जाते. माघी गणेश जयंतीला विनायकी चतुर्थी, वरद चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी असेही संबोधले जाते.
माघी गणेश जयंतीला भक्त विधीपूर्वक श्री गणेशाची पूजा करतात. शास्त्रानुसार, अधर्माचा नाश करून धर्माची स्थापना करण्यासाठी श्री गणरायाने कश्यप ऋषींच्या कुळात ‘विनायक’ या नावाने अवतार घेतला आणि नरांतक राक्षसाचा संहार केला. या दिवशी मोदक, तिळगुळाचे लाडू किंवा तिळाचे नैवेद्य अर्पण केले जाते. तिळ पवित्रतेचे, तपस्येचे आणि आत्मशुद्धीचे प्रतीक मानले जाते, म्हणून तिळ-मिश्रित गुळाचा नैवेद्य करणे विशेष महत्त्वाचे आहे.
माघी गणेश जयंती २०२६: मुहूर्त आणि पूजा विधी
हिंदू पंचांगानुसार, माघी गणेश जयंती २२ जानेवारी रोजी साजरी होणार आहे. पंचांगानुसार ही तिथी मध्यरात्री २ वाजून ४८ मिनिटांनी सुरू होऊन २३ जानेवारी रोजी रात्री ०२ वाजून २८ मिनिटांपर्यंत राहणार आहे. तिथीनुसार २२ जानेवारी या दिवशी विधीपूर्वक गणेशाची पूजा केली जाईल.
गणेश पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी ११:२८ ते दुपारी १:४२ असेल. या जवळपास दोन तासांच्या काळात भक्त गणेशाची प्रतिष्ठापना, पूजा आणि आराधना करू शकतात.
पूजा विधी -
स्नान: सकाळी लवकर उठून तिळाचे उटणे लावून स्नान करावे. स्नानाच्या पाण्यात थोडे तीळ टाकणे शुभ मानले जाते.
संकल्प: गणपतीसमोर बसून व्रत आणि पूजेचा संकल्प करावा.
स्थापना: पाटावर लाल वस्त्र अंथरून त्यावर गणपतीची मूर्ती किंवा फोटो ठेवावा.
अभिषेक: शक्य असल्यास मूर्तीवर अभिषेक करावा.
अर्पण: लाल फुले, कुंदाची फुले, दुर्वा आणि शेंदूर अर्पण करावे.
नैवेद्य: तिळगुळाचे लाडू किंवा मोदक अनिवार्य; २१ मोदकांचा नैवेद्यही अर्पण केला जातो.
आरती व मंत्र: ‘ओम गं गणपतये नमः’ या मंत्राचा जप करून आरती करावी.
माघी गणेश जयंती भक्तांसाठी सुख, समृद्धी आणि शांतीची प्रार्थना करण्याचा एक पावन दिवस आहे. विधीपूर्वक पूजा करून नैवेद्य अर्पण केल्यास गणपती बाप्पाकडून आशीर्वाद प्राप्त होतो.