पितृपक्ष संपल्यानंतर देवीभक्तांची आतुरता वाढते ती नवरात्रोत्सवासाठी. यंदा शारदीय नवरात्र २२ सप्टेंबर पासून सुरू होऊन ३० सप्टेंबरपर्यंत साजरी केली जाणार आहे. नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात देवी दुर्गेच्या नऊ स्वरूपांची आराधना केली जाते. या काळात भक्त मोठ्या श्रद्धेने उपवास करतात आणि घटस्थापनेपासून नवमीपर्यंत पूजाविधी पार पाडतात.
नवरात्रीत उपवासाचं महत्त्व
हिंदू धर्मशास्त्रानुसार उपवास म्हणजे केवळ अन्नसंयम नव्हे, तर मन, वाणी आणि आचरण यांच्यावर नियंत्रण ठेवणं. देवीची कृपा प्राप्त करण्यासाठी भक्तीभावाने व्रत पाळणं आवश्यक मानलं जातं.
उपवास करताना लक्षात ठेवण्याचे नियम
एक वेळच अन्नग्रहण - दिवसभरात फक्त एकदाच फराळ घ्यावा. वारंवार खाल्ल्यास उपवासाचं फळ कमी होतं.
तामसिक पदार्थ टाळा - मांसाहार, मद्य, गुटखा, पान-मसाला, मसालेदार किंवा अति तेलकट पदार्थ सेवन करू नये.
पाण्याचं सेवन मर्यादित - उपवासाच्या काळात सतत पाणी पिणं टाळावं. आवश्यकतेनुसारच घ्यावं.
अनवाणी व्रत - अनेकजण परंपरेनुसार नवरात्रीत चप्पल वापरत नाहीत.
सात्त्विक भोजन - खिचडी, फळं, दूध व उपवासातील हलके पदार्थ सेवन करावेत.
उपवास मोडताना काय करावे?
व्रत पूर्ण न करता मध्येच सोडावं लागल्यास, देवीसमोर क्षमा मागून उपवास समाप्त करावा.
सप्तमी, अष्टमी किंवा नवमीला व्रत सोडत असल्यास, नऊ कुमारी मुलींचं पूजन करून त्यांना भोजन व भेटवस्तू देणं आवश्यक. यालाच ‘कन्या पूजन’ म्हणतात.
नवरात्रीतील उपवास म्हणजे केवळ शारीरिक संयम नव्हे, तर अंतर्मन शुद्धीचं साधन आहे. नियमांचं पालन केल्यास व्रत अधिक फलदायी ठरतं. भक्तिभाव, संयम आणि शिस्त यांचं उत्तम मिश्रण म्हणजेच नवरात्र उपवास.
(Disclaimer: हा लेख इंटरनेटवर उपलब्ध माहितीवर आधारित आहे. याची 'नवशक्ति' पुष्टी करत नाही.)