
रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध आरे-वारे समुद्रकिनारी शनिवारी सायंकाळी एक दुर्दैवी घटना घडली. पोहण्यासाठी समुद्रात उतरलेल्या चार पर्यटकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्घटना सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली.
मृतांमध्ये जुनेद बशीर काझी (३०) आणि त्यांची पत्नी जैनब जुनेद काझी (२८) हे दोघेही रत्नागिरीमधील ओसवाल नगर येथील रहिवासी होते. त्यांच्यासोबत उजमा शमशुद्दीन शेख (१७) आणि उमेरा शमशुद्दीन शेख (१६) या दोन सख्या बहिणी होत्या, त्या ठाण्यातील मुंब्रा येथील रहिवासी होत्या. हे चौघे एकमेकांचे नातेवाईक असून पर्यटनासाठी आरे-वारे समुद्रकिनारी गेले होते.
गेल्या काही दिवसांपासून पावसाची उघडीप असल्याने समुद्रकिनारी पर्यटकांची गर्दी वाढली आहे. विशेषतः शनिवार-रविवारी येथे पर्यटकांची संख्या मोठी असते.
कशी घडली घटना -
शनिवारी हे चार पर्यटक आरे-वारे किनाऱ्यावर आले होते. त्यांनी समुद्रात पोहण्यासाठी उतरण्याचा निर्णय घेतला. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्यामुळे काही मिनिटांतच ते खोल पाण्यात गेले आणि बुडाले. स्थानिक ग्रामस्थांनी तसेच पोलिसांनी रेस्क्यू करत त्यांना जिल्हा रुग्णालयात हलवलं, मात्र डॉक्टरांनी चौघांनाही मृत घोषित केलं.
प्रशासनाची विनंती -
समुद्रकिनारे, किल्ले व पर्यटनस्थळी भेट देताना पर्यटकांनी सतर्कता व सुरक्षिततेचे नियम पाळावेत, अशी विनंती प्रशासनाने केली आहे. छोट्याशा निष्काळजीपणामुळे जीवघेण्या घटना घडत असून, प्रशासनाकडून वेळोवेळी इशारे देण्यात येतात, तरीही दुर्लक्षामुळे अशा दुर्दैवी घटना घडत आहेत.