मुंबई : अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथे सहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या अॅसिड हल्ल्याच्या घटनेचे पडसाद बुधवारी विधानसभेत उमटले. काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांनी या घटनेबद्दल स्थगन प्रस्तावाची सूचना दिली होती. यावेळी बोलताना, मुलीवरील उपचाराचा सर्व खर्च सरकार उचलेल, अशी घोषणा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली.
राज्यात मुली आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडली असून तेथील पोलीस अधीक्षकांवरही भ्रष्टाचाराचे आरोप असल्याचे सांगत वडेट्टीवार यांनी या गंभीर विषयावर सविस्तर चर्चेची मागणी केली. याच मुद्द्यावर काँग्रेसच्या नाना पटोले यांनीही सरकारवर टीका केली. शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुली जर असुरक्षित असतील तर ती राज्यासाठी अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना अशी घटना घडणे हे गृह विभाग आणि सरकारचे अपयश आहे असे पटोले म्हणाले.
दरम्यान, विखे-पाटील यांनी सभागृहाला या घटनेची माहिती देताना सांगितले की, तेरा वर्षांची मुलगी शाळेतून सायकलवरून घरी जात मोटारसायकलवरून असताना आलेल्या एका तरुणाने तिच्यावर अॅसिड फेकले. हा तरुण वडगाव (पान) गावातीलच असावा, असा संशय असून आरोपीच्या शोधासाठी गावकऱ्यांची मदत घेतली जात आहे. मुलीवर सध्या प्रवरा मेडिकल रुग्णालयात उपचार सुरू असून तिच्या उपचारांचा १०० टक्के खर्च राज्य सरकार उचलणार असल्याचे विखे-पाटील यांनी यावेळी जाहीर केले.
प्लास्टिक सर्जरीची गरज - पटोले
या घटनेत अकरा वर्षांच्या मुलीचा चेहरा गंभीररीत्या भाजला असून तिच्या डोळ्यांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्या तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून पुढे प्लास्टिक सर्जरी करावी लागणार आहे. त्यामुळे मुंबईतील मोठ्या रुग्णालयात तिचे उपचार करण्याची जबाबदारी सरकारने घ्यावी अशी मागणी पटोले यांनी केली.