

संपूर्ण राज्यभरात सध्या निवडणुकीची धामधूम सुरु असून सर्वच पक्षांकडून वेगवेगळी रणनीती आखण्यात येत आहे. त्यात नुकत्याच झालेल्या ठाकरे बंधूंच्या युतीनंतर राज्याचं राजकारण बदलल्याचं चित्र आहे. ठाकरे बंधूंच्या युतीनंतर वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पक्षाने युती जाहीर केली. त्यानंतर बहुचर्चित राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या दोन महत्त्वाच्या पक्षांनी रविवारी (दि.२८) पुण्यातील पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी एकत्र येत असल्याची घोषणा केली. यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटावर टीकास्त्र डागले. "संपूर्ण महाराष्ट्रात एकत्र येण्याची हिंमत नाही का?" असा टोला अंजली दमानिया यांनी लगावला.
सोशल मीडियावर X च्या माध्यमातून अंजली दमानिया म्हणाल्या, “महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास” म्हणता, मग दोन्ही राष्ट्रवादी फक्त पिंपरी–चिंचवडपुरतेच एकत्र का? संपूर्ण महाराष्ट्रात एकत्र येण्याची हिंमत, इच्छाशक्ती आणि प्रामाणिकपणा नाही का? की विकास, विचारसरणी आणि तत्त्वे सत्तेच्या गणितापुढे गहाण टाकली आहेत?" असा सवाल दमानिया यांनी उपस्थित केला.
पुढे भाजपवर टीका करताना त्या म्हणाल्या, "भाजपाला नवाब मलिक असलेला अजित पवार गट विधान सभेत चालतो, पण मुंबईत चालत नाही? काय अजब राजकारण चालू आहे."
दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. खासदार अमोल कोल्हे आणि रोहित पवारांसोबत झालेल्या तीन गुप्त बैठकांमध्ये अजित पवारांची आघाडी करण्याबाबत प्रदीर्घ चर्चा झाली. अखेर या बैठकांना आता मूर्त रूप आल्याचे दिसून येत आहे.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे पक्ष एकत्र येताना पाहायला मिळत आहेत. त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या पक्षांच्या युतीवर अंजली दमानिया यांनी भाष्य केल्यानंतर या दोन्ही पक्षांची युती फक्त पुण्यातच सीमित राहते की संपूर्ण महाराष्ट्रात युती होते, हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.