नागपूर : बारा तास नाही, तर बारा महिने थांबावे लागले तरी परत जाणार नाही. उद्या बारा वाजेपर्यंत मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर विमान वाहतूक आणि रेल्वे वाहतूकही थांबवू, असा इशारा ‘प्रहार’ संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी दिला आहे. आपण किल्ल्यात प्रवेश केला आहे. दडून बसलेल्या फडणवीसांना बाहेर यावेच लागेल आणि सातबारा कोरा करावा लागेल, असा इशारा कडू यांनी दिला.
माजी मंत्री बच्चू कडू हे शेतकऱ्यांची कर्जमाफी तसेच इतर मागण्यांसाठी चांगलेच आक्रमक झाले आहेत. सध्या त्यांनी मोठे आंदोलन उभे केले आहे. त्यांचा मोर्चा सध्या नागपुरात पोहोचला असून कर्जमाफी करण्यासंदर्भात तत्काळ निर्णय घ्या अन्यथा आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘रामगिरी’ बंगल्याकडे कूच करू, असा इशारा त्यांनी दिला आहे.
ते म्हणाले की, काल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा गेम होता की मुंबईला बोलावून गेम करणार होते. आपण तिथे जायचे नाही, तर सरकारला इथे बोलवायचे. पैसे खिशात नसताना शेतकरी ट्रॅक्टर घेऊन आले आहेत. बायकांचे मंगळसूत्र मोडले आणि इथे आले. लढाई सोपी नाही, असे कडू म्हणाले.
आपण मोर्चा हाणून पाडू, असे सरकारच्या डोक्यात आहे. फक्त कापूस शेतकऱ्यांची अडचण नाही, तर सर्वच शेतकरी अडचणीत आहेत. आंदोलन उभे राहणे कठीण असते. एकदा आंदोलन थांबले तर पुढे पुन्हा उभे करणे कठीण असते, असे बच्चू कडू म्हणाले. जिल्हा परिषद निवडणुकीची तिकीट मिळाली आणि गावाकडे परतले असे होऊ नये. आज जेवढी संख्या आहे, उद्या यापेक्षा चौपट संख्या असली पाहिजे, असे कडू म्हणाले.
शक्तीपीठ महामार्ग का करायचाय? मुंबईत एवढे हजारो कोटी खर्च करायची गरज काय? मुंबईचे स्वतःचे एवढे बजेट असताना आणखी खर्च का? असे सवाल बच्चू कडू यांनी केले. आणखी किती दिवस सहन करायचे. आता मागे हटायचे नाही, असे बच्चू कडू म्हणाले. तुम्हाला त्रास होईल. जेवणापाण्याची अडचण होईल. मात्र, ही लढाई एका दिवसाच्या जेवणाची नाही तर आयुष्यभराच्या जेवणाची लढाई आहे. गावाला परत जाऊ नका. एक गेल्याने काय होते असे विचार करुन परत जाऊ नका, असे आवाहन त्यांनी केले.
तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने याल अशी अपेक्षा नव्हती, मात्र, तुम्ही स्वखर्चाने आले. चारही दिशांनी आले. तुमच्या प्रयत्नांना माझा सलाम असल्याचे कडू म्हणाले. तुम्हाला इथे थांबल्यावर झोपण्यासाठी मागे जावे लागेल, बाजूला बगीचा आहे, मंगल कार्यालय आहे, ते ताब्यात घेऊ. दार तोडावे लागले तर तोडून टाकू. ताब्यात घेऊ ते आपलेच आहे, असे बच्चू कडू म्हणाले.
संघाला दया येईल!
देवाभाऊच्या घरी जाण्याचा कार्यक्रम आपण टाळला आहे. उद्या १२ वाजता थेट रेल्वे थांबवू, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. सर्व आंदोलने मुंबईत का करावी? नागपुरात आमचे देवाभाऊ आहेत, नितीनभाऊ आहेत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे. भाजपला दया नाही आली तर संघाला दया येईल, असे कडू म्हणाले.