कोस्टल रोड, अटल सेतू पुलामुळे मुंबईला नवी ओळख; आयटी क्षेत्रामुळे पुण्याची ओळख - डॉ. गगराणी

आयटी क्षेत्रामुळे पुण्याची ओळख निर्माण झाली. गेल्या काही वर्षांत पुण्याचा विकास झाला, त्यामुळे पुणे आज जगाला पुणे माहीत झाले. न्हावा शिवा अर्थात अटल सेतू व कोस्टल रोडमुळे पुढील काही वर्षांत मुंबईत अमुलाग्र बदल होतील.
कोस्टल रोड, अटल सेतू पुलामुळे मुंबईला नवी ओळख; आयटी क्षेत्रामुळे पुण्याची ओळख - डॉ. गगराणी

मुंबई : आयटी क्षेत्रामुळे पुण्याची ओळख निर्माण झाली. गेल्या काही वर्षांत पुण्याचा विकास झाला, त्यामुळे पुणे आज जगाला पुणे माहीत झाले. न्हावा शिवा अर्थात अटल सेतू व कोस्टल रोडमुळे पुढील काही वर्षांत मुंबईत अमुलाग्र बदल होतील. वाणिज्यिक तसेच रहिवासी क्षेत्रात या रिअल इस्टेट क्षेत्राचा प्रभाव राहणार आहे. मुंबईकर या बदलात कसे योगदान देतात तसेच प्रकल्पाचा स्वीकार कसा करणार, यावर अनेक गोष्टी आधारित आहेत, असे पालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी यांनी स्पष्ट केले. २० मार्च रोजी आयुक्तपदाची धुरा सांभाळली असून आज दोन महिने झाले. बदलत्या मुंबईचे आम्ही साक्षीदार आहोत. मुंबईच्या विकासासाठी आवश्यक त्या गोष्टी करण्यावर भर देण्यात येईल, असेही भूषण गगराणी म्हणाले. मुंबई प्रेस क्लबमध्ये आयोजित वार्तालापात ते बोलत होते. यावेळी सेवानिवृत्त आय एम एस आर सी सिन्हा, आर्किटेक्ट पी के दास व मुंबई प्रेस क्लबचे अध्यक्ष गुरबीत सिंग उपस्थित होते.

एमएमआरडीएच्या माध्यमातून मुंबईत ५० हजार कोटींची कामे सुरू आहेत. तर मुंबई महापालिकेच्या माध्यमातून मुंबईत दोन लाख ५० हजार कोटींची कामे सुरू आहेत. मुंबईतील शिवरेज लेन, पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन या ब्रिटीशकालीन असून त्या बदलण्याची कामे सुरू आहेत. तर १२० किमी अंतरावरून मुंबईला दररोज ३९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. मुंबईकरांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर आहे. पादचाऱ्यांसाठी फुटपाथ मोकळे ठेवणे, हे मोठे आव्हान असले तरी ते चॅलेंज स्वीकारत पादचाऱ्यांसाठी फुटपाथ मोकळे करण्यात येतील, असेही ते म्हणाले.

पुढील दोन वर्षांत मुंबईत मेट्रोचे जाळे विस्तारले जाईल. त्यामुळे वाहतूककोंडीची समस्या कमी होईल. सार्वजनिक ट्रान्सपोर्टला प्राधान्य देण्यात येत असून मुंबईकरांच्या सुखकर प्रवासासाठी आणखी काही करता येईल, यावर लक्ष केंद्रित केल्याचे गगराणी यांनी स्पष्ट केले.

माझी प्रथम ३० वर्षांपूर्वी सिडकोत नियुक्ती झाली त्यावेळी नवी मुंबई नव्हतीच. त्यावेळची लोकसंख्या ३० हजार होती. आठवड्याच्या ७ दिवसांत ३ दिवस रस्त्यांची दुरुस्ती सुरु असायची. टेलिफोन सुविधा नव्हती. रेल्वे नव्हती. मुंबईपासून जवळ असलेल्या त्यावेळच्या नवी मुंबईला जोडण्यासाठी रेल्वे महत्त्वपूर्ण हे लक्षात आले आणि रेल्वे जोडणीसाठी पाया रचला आणि आज मुंबई नवी मुंबईत काहीच अंतर राहिलेले नाही, असे सेवानिवृत्त आयएमएसआरसी सिन्हा म्हणाले.

मुंबईकरांसाठी सूक्ष्म नियोजन

महानगरपालिका अनेक नागरी सेवा देताना गरीब श्रीमंत कोणताच भेदभाव करत नाही. पाणी, मलनिस्सारण प्रक्रिया प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन, उद्याने अशा अनेक सेवा सर्व नागरिकांना एकसमान पद्धतीने महानगरपालिकेच्या माध्यमातून पुरविण्यात येतात. शेवटच्या व्यक्तीसाठी वाहतुकीची सुविधा कशापद्धतीने देता येईल यासाठी महानगरपालिका, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, बेस्ट उपक्रम यांच्या माध्यमातून सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे, असेही गगराणी यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in