
पुणे: ‘केसरी’चे विश्वस्त-संपादक, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती व लोकमान्य टिळक यांनी स्थापन केलेल्या अनेक संस्थांचे आधारवड डॉ. दीपक जयंतराव टिळक यांचे अल्पशा आजाराने बुधवारी (दि. १६) पहाटे निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात चिरंजीव डॉ. रोहित टिळक, कन्या डॉ. गीताली टिळक, स्नुषा डॉ. प्रणति रोहित टिळक, जामात, नातवंडे असा परिवार आहे. डॉ. टिळक हे मागील काही दिवसांपासून आजारी होते. मागील आठवड्यात त्यांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर ते घरी परतले होते. काल पहाटे त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.
सकाळी ८ ते ११ या वेळेत त्यांचे पार्थिव केसरीवाड्यातील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर मुकुंदनगर येथील टिळक महाराष्ट्र विद्यापीठात पार्थिव ठेवण्यात आले. त्यावेळी दर्शनासाठी मोठी रीघ लागली होती. दुपारी १२.३० च्या सुमारास डॉ. टिळक यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह पत्रकारिता, शैक्षणिक, राजकीय, यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.