छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी राज्यपाल यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर राज्य मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांनीही शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त विधाने केल्याने सरकारची पुरती कोंडी झाली आहे. त्यातच भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला, असे वक्तव्य करून नवा वाद ओढवून घेतला आहे. प्रसाद लाड यांनी या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त केली असली तरी त्यावरून विरोधकांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत भाजप नेत्यांच्या अशा विधानामुळे राज्य सरकारची मात्र कोंडी होत आहे. येत्या नागपूर येथे होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात याचे निश्चित पडसाद उमटणार आहेत.
...तर मंत्रिपद गेले खड्यात; शिंदे गटाच्या नेत्याने दिला इशारा!
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल गेल्या काही दिवसांत जी वक्तव्ये विशेषत: भाजप नेत्यांकडून येत आहेत, त्यावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना तर परत पाठवा, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यातच आता प्रसाद लाड यांच्या वक्तव्याची भर पडली आहे. कोकणविषयक एका कार्यक्रमात बोलताना प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवरायांचा जन्म कोकणात झाला, असे वक्तव्य केले होते.
लाड यांनी व्यक्त केली दिलगिरी
प्रसाद लाड यांनी या प्रकाराबाबत दिलगिरीही व्यक्त केली आहे. ‘‘मी ज्या वेळेला बोलताना चुकलो, तेव्हा लगेचच दुरुस्ती केली होती. यामधून कोणाचेही मन दुखविण्याचा माझा हेतू नव्हता. या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो,’’ असे लाड यांनी स्पष्ट केले आहे.
लाडांनी इतिहासाची शिकवणी लावावी
रायगडावर त्यांचे बालपण गेल्याचेही लाड म्हणाले. त्यावरून त्यांच्यावर जोरदार टीका झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. खा. अमोल कोल्हे यांनी लाड यांना चौथीच्या विद्यार्थ्यांकडून इतिहासाची शिकवणी लावण्याचा सल्ला दिला आहे. भाजपने इतिहास संशोधन मंडळाची स्थापना केली आहे का, असा सवाल खा. संजय राऊत यांनी केला आहे. स्वराज्य संघटनेचे संस्थापक संभाजीराजे छत्रपती यांनी सातत्याने येणाऱ्या वक्तव्यांमागे षड्यंत्र तर नाही ना, असा संशयही केला आहे.
Sanjay Raut : संजय राऊत फाटक्या तोंडाचे; शिंदे गटाच्या या आमदाराने केली सडकून टीका