
मुंबई : महायुतीला जनतेने एक हाती सत्ता स्थापन करण्याचा बहुमान दिला आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपदी बसण्याचाही मान दिलेला नाही. मात्र हिवाळी अधिवेशनापूर्वी विरोधी पक्षनेतेपद मविआला मिळावे यासाठी मविआच्या नेत्यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपद देण्याबाबतचा प्रस्ताव रविवारी विशेष अधिवेशनात सादर केला आहे.
दरम्यान, विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीनंतर त्यावर निर्णय होणार असून विरोधी पक्ष पद मिळेल, असा आशावाद आघाडीचे नेते भास्कर जाधव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
विधानसभा निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढवल्या. त्यामुळे आघाडी म्हणून विरोधी पक्षनेतेपद मिळावे, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेना (ठाकरे) आमदार भास्कर जाधव आणि माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन दिला.
यासंदर्भातील प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना यावेळी देण्यात आला आहे.
विरोधी पक्षनेतेपद मिळावे यासाठी आघाडी एकत्रित मिळून प्रयत्न करत आहे. विधानसभा अध्यक्ष निवडल्यानंतर आम्हाला विरोधी पक्षनेतेपद देण्याबाबत विचार होणार आहे. विरोधी पक्षनेतेपद आम्हाला मिळेल, असा विश्वास शिवसेना (ठाकरे) विधिमंडळाचे गटनेते भास्कर जाधव यांनी व्यक्त केला.
इतिहासात प्रथमच विरोधी पक्षनेतेपद नाही
विधानसभा निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीचा दारुण पराभव केला. आघाडीला केवळ ४६ जागा जिंकता आल्या. सर्वाधिक २० जागा शिवसेनेला (ठाकरे) मिळाल्या. तर कॉंग्रेस १६ आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने (शरद पवार) १० जिंकल्या. दुसरीकडे महायुतीने सर्वाधिक २३४ जागांवर विजय मिळवला. अशातच अपुऱ्या संख्याबळामुळे आघाडीतील घटक पक्षाला विरोधी पक्षनेतेपदसुद्धा राखता आलेले नाही. राज्याच्या इतिसाहात प्रथमच विधानसभेतून विरोधी पक्षनेतेपद रिकामे राहणार आहे.