

ठाणे : राज्य शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत ठाणे जिल्ह्यातील सर्व लाभार्थ्यांनी आपली ई-केवायसी प्रक्रिया १८ नोव्हेंबरपूर्वी पूर्ण करणे आवश्यक असल्याचे आवाहन महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय बागुल यांनी केले.
ही योजना महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने सुरू केलेली महत्त्वाची योजना असून पात्र महिलांना दरमहा आर्थिक मदत मिळते. हा लाभ अखंडपणे सुरू राहण्यासाठी ई-केवायसी पूर्ण असणे बंधनकारक आहे.
ई-केवायसी म्हणजे काय?
ई-केवायसी ही लाभार्थ्यांच्या आधार क्रमांक आणि बँक खात्याशी संबंधित माहितीची पडताळणी करण्याची प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया पूर्ण केल्यास पुढील सर्व अनुदान हप्ते कोणत्याही अडथळ्याशिवाय लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होतात.
ई-केवायसी कुठे करावी?
लाभार्थ्यांनी खालील ठिकाणी जाऊन ई-केवायसी पूर्ण करू शकतात. संबंधित अंगणवाडी केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय, महिला बालविकास कार्यालय, कॉमन सर्व्हिस सेंटर आदी ठिकाणी ई-केवायसी करता येणार आहे.
ई-केवायसी करताना आधार कार्ड, बँक पासबुक, नोंदणीकृत मोबाईल क्रमांक असणे गरजेचे आहे. निर्धारित मुदतीत ई-केवायसी पूर्ण न करणाऱ्या लाभार्थ्यांचे अनुदान तात्पुरते स्थगित राहू शकते. त्यामुळे सर्व पात्र महिलांनी १८ नोव्हेंबरपूर्वी प्रक्रिया पूर्ण करून योजनेतील लाभ घेत राहावेत. - संजय बागुल, जिल्हा कार्यक्रम अधिकारी