

महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील खरोळा गावात संतापजनक घटना समोर आली आहे. बोअरवेलच्या वायर चोरीचा संशय घेत गावकऱ्यांनी तीन अल्पवयीन मुलांना शेतातील खांबाला बांधून बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यानंतर संताप व्यक्त केला जात आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये दोन अल्पवयीन मुलांना खांबाला बांधून एक व्यक्ती त्यांना काठीने निर्दयीपणे मारहाण करत असल्याचे दिसत आहे. तसेच आणखी एका मुलालाही काही जण मारहाण करत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसते. मुले अल्पवयीन असल्याने ती मारहाण थांबवण्याची गयावया करत होती. मात्र, त्यांच्या वारंवार विनवणीनंतरही गावकरी त्यांना मारहाण करत राहिल्याचा आरोप आहे.
चोरीचा संशय, गावकऱ्यांनी घेतला कायदा हातात
मिळालेल्या माहितीनुसार, या तिन्ही मुलांवर शेतातील बोअरवेलची वायर चोरी केल्याचा संशय होता. मात्र, पोलिसांना माहिती देण्याऐवजी गावकऱ्यांनी स्वतःच कायदा हातात घेत मुलांना खांबाला बांधून मारहाण केल्याचे समोर आले आहे.
घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी या प्रकाराचा निषेध केला आहे. चोरीचा संशय असला तरी अल्पवयीन मुलांना अशा प्रकारे अमानुष मारहाण करणे चुकीचे असल्याच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून व्यक्त होत आहेत.
पोलिसांकडून दोन स्वतंत्र गुन्हे दाखल
'न्यूज18'च्या वृत्तानुसार या प्रकरणी रेणापूर पोलिसांनी मारहाण करणाऱ्या संबंधित गावकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच बोअरवेलची वायर चोरी केल्याच्या आरोपावरून तिन्ही अल्पवयीन मुलांविरोधातही स्वतंत्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सध्या पोलिसांकडून दोन्ही गुन्ह्यांचा तपास सुरू असून, घटनेच्या सर्व पैलूंची चौकशी केली जात आहे.