

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जनतेची पसंती दिली असली तरी विधानसभा निवडणुकीत चित्र पूर्णपणे बदलले. मविआच्या १६० जागा येतील, असा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला होता. मात्र प्रत्यक्षात मविआला ६० जागा मिळाल्या नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि काँग्रेस यांच्याबरोबर एकत्रित निवडणूक लढवूनही शिवसेनेला फायदा होत नसेल तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने यापुढे निवडणुकीच्या मैदानात स्वबळावर उतरावे, अशी भावना निष्ठावंत शिवसैनिकांनी व्यक्त केली.
अडीच वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आणि स्वतःची शिवसेना स्थापन केली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महायुती सरकार सत्तेत आले. एकनाथ शिंदे यांच्या विरोधात उद्धव ठाकरेंची शिवसेना सर्वोच्च न्यायालयात गेली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना कोणाची याचा निर्णय घेण्याचा अधिकार केंद्रीय निवडणूक आयोगाला दिला. केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांची खरी शिवसेना यास हिरवा कंदील दिला. त्यानंतर अडीच वर्षांपासून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार कार्यरत आहे.