

पुणे : उत्तरेकडील तीव्र थंड वाऱ्यांचा झंझावाती प्रवेश महाराष्ट्रात झाल्याने राज्यातील तापमानात मोठी घसरण झाली आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात थंडीचा कडाका वाढला असून अनेक ठिकाणी रात्रीचे किमान तापमान नेहमीपेक्षा ४ ते ६ अंशांनी कमी नोंदले जात आहे. पुढील ४८ तासांत थंडी आणखी तीव्र होणार, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
राज्यातील अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, सोलापूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांत शुक्रवारी लक्षणीय थंडीची लाट जाणवली. जेऊर येथे राज्यातील सर्वात कमी ५.० अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. अहिल्यानगरने सलग तिसऱ्या दिवशी राज्यातील सर्वात थंड जिल्हा म्हणून नोंद कायम ठेवली असून येथे किमान तापमान ६.६ अंश होते.
अहिल्यानगर आणि धुळे जिल्ह्याच्या काही भागांत तापमान ४ अंशांपर्यंत घसरल्याची नोंद आहे. धुळे व निफाड येथील गहू संशोधन केंद्रात ६.१ अंश, जळगाव येथे ६.९ अंश, तर परभणीमध्ये ५.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. नाशिक, सातारा, वाशिम, गोंदिया आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्येही किमान तापमान १० अंशांखाली राहिले.
हवामान तज्ज्ञांच्या मते, ‘ला निनो’ प्रक्रियेच्या प्रभावामुळे डिसेंबर आणि जानेवारी हे दोन्ही महिने राज्यात सर्वाधिक थंड जाण्याची शक्यता आहे.
'ऑरेंज' आणि 'यलो' अलर्ट जारी
थंडीची तीव्रता लक्षात घेता हवामान विभागाने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, तेलंगणा आणि छत्तीसगड परिसरासाठी 'ऑरेंज अलर्ट' जाहीर केला आहे. तर जळगाव, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, नागपूर, गोंदिया यांसह अनेक जिल्ह्यांसाठी 'यलो अलर्ट' जारी केला आहे. मराठवाड्यातील जालना, बीड, परभणी, नांदेड, लातूर आणि विदर्भातील गोंदिया व नागपूर जिल्ह्यांत पुढील काही दिवस तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता वर्तवली आहे.