

राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असून १३ ते १५ ऑगस्टदरम्यान राज्यातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. समुद्रसपाटीपासून ३.१ ते ५.८ किलोमीटर उंचीवर बंगालच्या उपसागराच्या मध्य भागावर चक्रीय फिरती प्रणाली निर्माण झाली आहे. त्याच्या प्रभावाखाली १३ ऑगस्टला बंगालच्या उपसागराच्या पश्चिम-मध्य व लगतच्या उत्तर-पश्चिम भागावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. येत्या ४८ तासात ते अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
तीन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
त्यामुळे राज्यातील कोकण आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. १३ ऑगस्टला चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्याला ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमधील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विजांच्या कडकडाटासह ४० ते ५० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील. मुंबईतदेखील १३ ऑगस्टला मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
‘यलो अलर्ट’ कुठे?
गेल्या काही दिवसांपासून मुंबईत अधूनमधून पाऊस पडत आहे. मात्र, यावेळी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाल्याने राज्यात पुढील पाच दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. कोकणातही बहुतांश ठिकाणी पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. ठाण्यासह पुणे, सातारा, अहिल्यानगर, सांगली, सोलापूर, कोल्हापूरमध्येही ‘यलो अलर्ट’ असणार आहे. तर मराठवाड्यात लातूर धाराशिव, बीडमध्येही ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. विदर्भात उद्यापासून तीन दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.