

मुंबई : बिनविरोध निवडणुकीमुळे चर्चेत असलेल्या विधान परिषदेच्या राज्यातील ११ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी गुरुवारी शांततेत मतदान पार पडले. सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत झालेल्या मतदानात एकूण ७ हजार ४७ मतदारांपैकी ६ हजार ९७८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे राज्यभरात सरासरी ९९.०२ टक्के इतके मतदान नोंदविण्यात आले. या निवडणुकीची मतमोजणी २२ जूनला होणार आहे.
भारत निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या १७ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी १८ मे रोजी निवडणूक जाहीर केली होती. या १७ जागांमध्ये नागपूर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा समावेश आहे. सहा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने पुणे, ठाणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरी-रायगड, यवतमाळ, वर्धा -चंद्रपूर-गडचिरोली, अहिल्यानगर या ठिकाणी महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. त्यामुळे आज ११ जागांसाठी मतदान पार पडले.
या निवडणुकीत भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात सर्वच्या सर्व म्हणजे ४५७ मतदारांनी मतदान केल्याने १०० टक्के मतदानाची नोंद झाली. तर अमरावती मतदारसंघात ४५१ पैकी ४२७ मतदारांनी मतदान करत ९४.६८ टक्के मतदान झाले, जे सर्वात कमी राहिले.