धो धो बरसणार! मुंबईसह हवामान विभागाचा 'या' जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा, बघा रेड-ऑरेंज-यलो अलर्ट कुठे?

हवामान विभागाने १३ जूनपासून राज्यात मान्सून सक्रीय होण्याची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार, अनेक जिल्ह्यांत पावसाने जोरदार हजेरी लावली असून रविवारपासून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार सध्या राज्यातील कमाल तापमानात घट झाली आहे. त्यामुळे...
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

हवामान विभागाने १३ जूनपासून राज्यात मान्सून सक्रीय होण्याची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार, अनेक जिल्ह्यांत पावसाने जोरदार हजेरी लावली असून रविवारपासून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार सध्या राज्यातील कमाल तापमानात घट झाली आहे. कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट देण्यात आलाय, ते पाहूया...

मुंबईला ऑरेंज अलर्ट

सोमवारी पहाटे मुंबईत २ ते ५ या वेळेत झालेल्या मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले. पाणी साचल्यामुळे अनेक सखल भाग पाण्याखाली गेले. लोकलसेवेवरही परिणाम झाला. त्यामुळे हवामान खात्याने दिवसभरासाठी मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबई ठाण्यासह आजूबाजूच्या परिसरात सोमवारी दुपारनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस देखील पडू शकतो. साधारण आठडाभर पावसाचे असेच वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे.

रायगडला 'रेड अलर्ट', रत्नागिरी-सिंधुदुर्गला 'ऑरेंज अलर्ट'

हवामान विभागानुसार, कोकणात पावसाचा जोर कायम राहणार असून रायगड जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परिणामी, रायगड जिल्ह्यासाठी ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. याशिवाय, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठीही 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे.

पुणे, सातारा, कोल्हापूर, विदर्भ, नाशिकमध्ये काय?

पुणे घाट, सातारा घाट आणि कोल्हापूर घाट परिसरात मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, विदर्भातही गुरूवारपर्यंत पाऊस बरसण्याचा अंदाज आहे. पुढील चार दिवस येथील काही राज्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यातह पावसाची दोन दिवसांपासून दमदार बॅटिंग सुरू असून हवामान विभागाने यापूर्वीच जिल्ह्याला यलो अलर्ट दिला आहे.

दरम्यान, राज्यभरात सर्वत्र पावसाचा जोर वाढल्यामुळे नद्या आणि धरणांच्या पाणीपातळीवर लक्ष ठेवले जात आहे. यंदा वरुणराजाचे वेळेआधीच आगमन झाले. २४ मे रोजी केरळात, तर महाराष्ट्रात २५ मे रोजी पावसाची एंट्री झाली. मान्सूनची लवकर एंट्री झाल्याने जून महिना पाऊस गाजवणार असा अंदाज होता. मात्र २४ ते २८ मेपर्यंत पावसाने राज्यातील अनेक जिल्ह्यांना झोडपून काढले. परंतु जूनच्या सुरुवातीपासून पावसाने ब्रेक घेतला. त्यानंतर, आता राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

जगबुडी नदी धोक्याच्या पातळीजवळ

जगबुडी नदीची खेड येथे इशारा पातळी ५ मीटर असून सध्या नदीची पाणी पातळी ५.९ मीटर इतकी आहे. जगबुडी नदीची धोका पातळी ७ मीटर असून ती या पातळीजवळ आल्याने सावधगिरी बाळगण्यात येत आहे.

logo
marathi.freepressjournal.in