

राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला मोठे यश मिळाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले आहेत. हा विजय कार्यकर्त्यांचा असून त्यांच्या मेहनतीचे फळ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
फडणवीस म्हणाले की, "महाराष्ट्रातील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा तसेच पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाने हे दणदणीत यश संपादन केले."
२०१७ च्या तुलनेत मोठी वाढ
दुपारी ३ वाजेपर्यंत आलेल्या कल व निकालांनुसार, २०१७ मध्ये भाजपाने ९४ नगरपालिकांवर विजय मिळवला होता, तर यंदा ही संख्या वाढून १२९ नगरपालिकांवर (४५ टक्के) पोहोचली आहे.
महायुती म्हणून एकूण २८८ पैकी २१५ नगरपालिका (७४.६५ टक्के) जिंकण्यात यश मिळाल्याचा दावा फडणवीस यांनी केला.
नगरसेवकांच्या जागांत दुप्पट वाढ
नगरसेवकांच्या जागांचा विचार करता, २०१७ मध्ये भाजपाला १६०२ जागा मिळाल्या होत्या. यंदा या जागांची संख्या ३३२५ (४७.८२ टक्के) इतकी झाली असून, भाजपाने दुपटीहून अधिक जागांवर विजय मिळवला आहे.
महायुती म्हणून एकूण ६९५२ पैकी ४३३१ जागा (६२.३० टक्के) जिंकण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.
कार्यकर्त्यांचे कौतुक, पुढील निवडणुकांचे संकेत
महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली झालेली ही पहिलीच निवडणूक असल्याचे सांगत, फडणवीस यांनी त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले. तसेच या निवडणुकीसाठी परिश्रम घेणाऱ्या सर्व नेते आणि कार्यकर्त्यांचे त्यांनी कौतुक केले.
“ही निवडणूक आगामी महानगरपालिका निवडणुकांचा ट्रेलर आहे. यापेक्षा मोठे यश संपादन करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी ताकदीने कामाला लागावे,” असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले.