

मुंबई : राज्यातील उष्णतेच्या लाट आणखी चार दिवस कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याच वेळी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी शनिवारी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे तर, विदर्भात मंगळवारी २८ एप्रिलला वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, सिंधुदुर्ग तसेच गोव्यात शुक्रवारी अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह काही काळ जोरदार पाऊस झाला.
शुक्रवारी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा ४४ ते ४५ अंशाच्या आसपास राहिला. अकोल्यात विक्रमी ४५ अंश तापमानाची नोंद झाली आहे. तर अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा, नागपूर इत्यादी भागात तापमान ४४ अंशांच्या आसपास होते. दरम्यान, पुणे शहरात दुपारनंतर अचानक हवामानात बदल होत अनेक भागांत जोरदार पावसाला सुरुवात झालीया अवकाळी पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली.