मुंबई : गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या गणेशभक्तांच्या ग्रुप बुकींगच्या तिकीट दरात तब्बल ३० टक्क्यांची भाडेवाढ करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. याबाबतचे परिपत्रक एसटी महामंडळाने नुकतेच जारी केले असून हा निर्णय २२ जुलै पासून लागू झाला आहे. या निर्णयाने महामंडळाने गणेशभक्तांच्या खिशावर डल्ला मारला आहे.
एसटी महामंडळाच्या बसमधून ४० प्रवाशांचा एखादा गट एखाद्या ठिकाणाहून थेट दुसऱ्या ठिकाणी प्रवास करणार असेल तर ग्रुप बुकींग पध्दतीने आरक्षण दिले जाते. प्रवाशांकडून प्रामुख्याने गौरी गणपती, होळी, आषाढी पंढरपूर यात्रा व इतरवेळी सुध्दा मोठ्या प्रमाणावर ग्रुप बुकींग पध्दतीने रा. प. बसेस आरक्षित केल्या जातात. सद्यस्थितीत ग्रुप बुकींग पध्दतीने बरा आरक्षित करताना प्रवाशांकडून प्रवाशांच्या एकुण अंतराकरिता येणाऱ्या टप्पेनिहाय प्रवास भाडयानुसार भाडे आकारणी केली जाते. तसेच ग्रुप बुकींग पद्धतीने आरक्षण करताना प्रवाशांना अमृत ज्येष्ठ नागरिक, महिला सन्मान योजना इत्यादी सवलत योजनांचा देखील लाभ दिला जातो.
ग्रुप बुकींगद्वारे प्रवाशांना बसेस उपलब्ध करुन देताना प्रामुख्याने प्रवासी बसण्याचे ठिकाण व उतरण्याचे ठिकाण यामधील अंतरानुसार येणाऱ्या प्रवासभाड्याची प्रती प्रवासी आकारणी करून बसेस आरक्षित केल्या जातात. या बसेसद्वारे प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहचविल्यानंतर परतीच्या प्रवासावेळी त्या मार्गावरील प्रवासी उपलब्ध होत नसल्याने तसेच ठराविक कालावधीत त्या मार्गावरून जास्त बसेस मार्गस्थ होत असल्याने बहुतांशी बसेस रिकाम्याच चालवाव्या लागतात व त्यामुळे महामंडळाचे आर्थिक नुकसान होते.
त्यामुळे महामंडळाने ग्रुप बुकींगद्वारे एकेरी पद्धतीने एसटीची बस आरक्षित करणाऱ्या प्रवाशांकडून मूळ प्रवास भाड्याच्या ३० टक्क्यांनी अधिक भाडे आकारणी करण्याचे निर्देश एसटी महामंडळाने राज्यातील एसटीच्या सर्व विभागांना दिले आहेत.