

रामनवमीच्या सुट्टीच्या पार्श्वभूमीवर मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर लोणावळ्याजवळ पुन्हा एकदा भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. घाटात ४ ते ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
घाटात वाहतूक ठप्प
गुरुवारी (दि. २६) सकाळी द्रुतगती मार्गावर वाहनांची प्रचंड वर्दळ वाढल्याने वाहतूक मंदावली. काही ठिकाणी वाहने अक्षरशः रांग लावून उभी असल्याचे चित्र पाहायला मिळाले. सकाळी सुमारे ८.४५ वाजता पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर किमान ३० मिनिटांचा विलंब झाल्याची माहिती आहे.
संतप्त प्रवाशांच्या प्रतिक्रिया...
वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झालेल्या प्रवाशांनी सोशल मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अनेकांनी ही समस्या आता 'दर आठवड्याची' बनल्याचे सांगत प्रशासनावर सवाल उपस्थित केले. "प्रत्येक विकेंडला हीच परिस्थिती असते, आता लोकांना याची होत चालली आहे," अशी प्रतिक्रिया एका प्रवाशाने दिली.
तर दुसऱ्या प्रवाशाने, "मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील कोंडी सोडवण्यासाठी ठोस उपाययोजना होत नाहीत. केवळ 'मिसिंग लिंक'ची वाट पाहण्याऐवजी पर्यायी उपाय तातडीने राबवावेत," अशी मागणी केली.
याशिवाय, "इंधन टंचाईच्या काळात शेकडो वाहने कोंडीत अडकलेली असणे धोकादायक आहे. आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्याचा मार्गही नसतो," असे म्हणत सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करण्यात आली.
काही प्रवाशांनी तर "महामार्गावर कोणतेही योग्य नियोजन दिसत नाही," अशी टीका करत परिस्थितीवर संताप व्यक्त केला.
तर या परिस्थितीवर मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग जणू "महाराष्ट्राचा हॉर्मूझ" बनल्यासारखा झाला आहे, अशी उपरोधिक प्रतिक्रिया एका प्रवाशाने व्यक्त केली.
टोल आणि व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह
वाहतूक कोंडी ही या मार्गावरील कायमची समस्या बनली असून टोल आकारला जात असतानाही प्रभावी वाहतूक नियोजन का होत नाही, असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. विशेषतः सुट्ट्यांच्या काळात ही समस्या अधिक तीव्र होते.
'मिसिंग लिंक' प्रकल्पाकडे अपेक्षा
मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग हा देशातील सर्वाधिक व्यस्त महामार्गांपैकी एक आहे. घाट परिसरातील वळणे, प्रचंड वाहनसंख्या आणि सुरू असलेली पायाभूत कामे यामुळे कोंडी निर्माण होते. या पार्श्वभूमीवर 'मिसिंग लिंक' प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करून प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी पुन्हा एकदा जोर धरत आहे.