

मुंबई : काही लोक राजकीय अंगाने पर्यावरणवादी बनले आहेत. कुंभमेळा हा निसर्गाशी साधर्म्य साधणारा आपल्या संस्कृतीचे एक प्रतीक आहे. काही लोकांना वाटतेय कुंभमेळ्यात अडथळे यावेत, अशा लोकांना सांगू इच्छितो की, आम्ही कुंभमेळ्यात अडथळे येऊ देणार नाही. तपोवनातील झाडे वाचविण्यासाठी अनेक पर्यायावर विचार सुरू, असल्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केली.
तपोवनातील झाडांची कत्तल करण्यावरुन सध्या नाशिकमध्ये पर्यावरणवाद्यांनी आंदोलन सुरू केले आहे. तपोवनातील झाडांची कत्तल न करता राज्य सरकारने साधुग्राम उभारणी करावी, अशी मागणी होऊ लागली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सरकारची भूमिका स्पष्ट केली. यावेळी ते म्हणाले की, कुंभमेळा, पर्यावरण आणि झाडे आपल्यासाठी महत्वाची आहेत. झाडे तोडण्याबद्दल माझे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मत एकच आहे. झाडे तोडली गेली नाही पाहिजेत. प्रयागराज कुंभमेळा ठिकाणी १५ हजार हेक्टर जागा आहे. आणि नाशिक येथे ३५० एकर जागा आहे.
२०१५-१६ च्या गुगल मॅप मध्ये एकही झाड येथे दिसत नाही. राज्य सरकारने वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेतला त्यावेळी नाशिक महानगरपालिकेने या ठिकाणी झाडे लावली. ही झाडे वाचविण्यासाठी अनेक पर्यायावर विचार सुरू आहे. विनाकारण काही लोकांनी ऍक्टिव्हिजन करणे सुरू केले आहे. तर काही लोक पर्यावरणवादी बनले आहेत. जे पर्यावरणवादी आहेत, त्यांच्याबद्दल मला आदर आहे. पण या विषयाचे राजकारण होतेय ते चुकीचे असल्याचे, मुख्यमंत्री म्हणाले.