

नाशिक : नाशिकच्या हरिहर किल्ल्यावरून परतणाऱ्या पर्यटकांच्या वाहनाला अडवून मारहाण आणि दगडफेक केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पर्यटन मार्गावर पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. हरिहर किल्ल्यावरून परतणाऱ्या पर्यटकांच्या वाहनाला अडवून मारहाण आणि दगडफेक केल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. त्र्यंबकेश्वर-घोटी मार्गावरील बोरीची वाडी परिसरात हा प्रकार घडल्याची माहिती आहे.
मोटारसायकलला कट मारल्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर पर्यटकांच्या वाहनाचा पाठलाग केल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यानंतर वावी हर्ष परिसरात गाडी अडवून चालक आणि प्रवाशांना काठी तसेच मारहाण करण्यात आल्याची फिर्याद आहे. या प्रकरणी १० जणांविरुद्ध घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांत दाखल झालेल्या तक्रारीनुसार, पर्यटक हरिहर किल्ल्यावरून वाहनाने परतत असताना मोटारसायकलला कट मारल्याच्या कारणावरून वाद झाला. त्यानंतर संबंधितांनी मोटारसायकलवरून पर्यटकांच्या गाडीचा पाठलाग केल्याचा आरोप आहे. काही अंतरापर्यंत पाठलाग केल्यानंतर वावी हर्ष परिसरात पर्यटकांची गाडी अडवण्यात आली. त्यावेळी आरोपींनी चालक आणि वाहनातील प्रवाशांना शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या हल्ल्यात चालक आणि प्रवाशांना काठीने तसेच हाताने मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी वाहनावर दगडफेक केल्याचा आरोप आहे. दगडफेकीमुळे गाडीच्या समोरील काचेचे आणि साईड मिररचे नुकसान झाले. तसेच वाहनाचे छत आणि बंपर देखील काठी आणि दगडांनी फोडल्याचा आरोप आहे. हल्ल्यादरम्यान आरोपींनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेमुळे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या हरिहर किल्ल्यावरून परतणाऱ्या पर्यटकांसोबतच हा प्रकार घडल्याने त्र्यंबकेश्वर-घोटी पर्यटन मार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.
घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
या प्रकरणी १० जणांविरुद्ध घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हलवली. पोलिसांनी कारवाई करत तासाभरात चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून त्यांचा ठावठिकाणा शोधण्यासाठी पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.