NEET-UG २०२६ पुनर्परीक्षेच्या अवघ्या एक दिवस आधी, शनिवारी (दि.२०) नागपूरमधील एका विद्यार्थ्याला परीक्षा केंद्र थेट अबूधाबी (यूएई) येथे देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विद्यार्थ्याने परीक्षेसाठी नागपूरला पहिली पसंती दिली असतानाही हॉल तिकीटावर अबूधाबीतील केंद्र आल्याने त्याच्यासह कुटुंबीयांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मूळ NEET परीक्षेसाठी या विद्यार्थ्याला नागपूरमधील सरस्वती विद्यालय येथे परीक्षा केंद्र देण्यात आले होते. मात्र, पेपरफुटी प्रकरणानंतर पुनर्परीक्षा जाहीर झाल्यावर त्याने नवीन हॉल तिकीट डाउनलोड केले असता त्यावर संयुक्त अरब अमीरातीतील अबूधाबी इंडियन स्कूल हे परीक्षा केंद्र असल्याचे दिसून आले. विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी सांगितले की, अर्ज भरताना त्याने पहिली पसंती नागपूर, त्यानंतर वर्धा आणि भंडारा या शहरांची निवड केली होती. त्यामुळे प्रवेशपत्रावर परदेशातील केंद्र पाहून त्यांनाही धक्का बसला.
विद्यार्थ्याचे वडील मोहम्मद तालीब यांनी सांगितले, "आमच्या मुलाला परीक्षा देण्यासाठी परदेशात पाठवणे शक्य नाही. त्याच्याकडे पासपोर्टही नाही आणि आता प्रवासाची तयारी करण्यासाठी वेळही उरलेला नाही."
NTA कडे तक्रार
एएनआयच्या वृत्तानुसार, कुटुंबीयांनी याप्रकरणी राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या (NTA) हेल्पलाइनवर तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर NTA ने या प्रकरणाची दखल घेत चूक झाल्याचे मान्य केले असून, पडताळणी पूर्ण झाल्यानंतर सुधारित प्रवेशपत्र जारी करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली.
माजी शिक्षणमंत्री डॉ. अनीस अहमद यांनी या प्रकारावर टीका करत NTA ची ही गंभीर चूक असल्याचे म्हटले आहे. संबंधित विद्यार्थ्याला नागपूर किंवा जवळच्या शहरात तातडीने परीक्षा केंद्र देण्याची मागणीही त्यांनी केली.
उद्या होणार पुनर्परीक्षा
दरम्यान, २१ जून रोजी होणाऱ्या NEET-UG २०२६ पुनर्परीक्षेसाठी NTA कडून व्यापक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. गोपनीय प्रश्नपत्रिका GPS यंत्रणा असलेल्या वाहनांमधून पोलिसांच्या बंदोबस्तात परीक्षा केंद्रांपर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत.
परीक्षा केंद्रांवर CCTV देखरेख, आधार आधारित बायोमेट्रिक पडताळणी आणि रिअल-टाइम मॉनिटरिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. देशभरातील ५५१ शहरांमध्ये आणि परदेशातील १४ शहरांमध्ये ही परीक्षा होणार असून सुमारे २२.७९ लाख विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत.
NTA ने विद्यार्थ्यांना सकाळी ११ ते दुपारी १.३० या वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचण्याचे आवाहन केले आहे. दुपारी १.३० नंतर प्रवेश बंद केला जाणार असून परीक्षा दुपारी २ ते ५.१५ या वेळेत होणार आहे.