

लासलगाव : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेत केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण निधी अंतर्गत महाराष्ट्रातील कांदा खरेदीचा दर प्रतिक्विंटल १,८७५ रुपयांवरून २,१२५ इतका वाढविला आहे. सुधारित दर शनिवार (दि. ४) पासून लागू करण्यात आला असून, त्यामुळे शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल २५० रुपये अधिक मिळणार असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय आहे.
केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या संचालक शिवानी गोयल यांनी याबाबतचे परिपत्रक जारी केले आहे. राष्ट्रीय कांदा बफर स्टॉक उभारण्यासाठी नाफेड व एनसीसीएफमार्फत कांदा खरेदीसाठी हा सुधारित दर लागू करण्यात आला आहे.
नव्या दरामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार असून बाजारातील कांद्याच्या किमतीही स्थिर ठेवण्यास मदत होणार आहे. सध्या खुल्या बाजारात कांद्याचे दर दबावाखाली असल्याने केंद्र सरकारचा हा निर्णय कांदा उत्पादकांसाठी महत्त्वाचा मानला जात आहे. दरवाढीमुळे नाफेड व एनसीसीएफच्या खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांचा प्रतिसाद वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, यापूर्वी दरवाढ होऊनही नाफेड व एनसीसीएफच्या खरेदी केंद्रांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता. सरकारने ३० जूनपर्यंत खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश दिले असताना उद्दिष्टाच्या ४० टक्के खरेदीदेखील नाशिक जिल्ह्यात पूर्ण झालेली नव्हती. मात्र, नव्या दरवाढीनंतर खरेदीला वेग येईल आणि अधिकाधिक शेतकरी या योजनेचा लाभ घेतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पाचव्यांदा दरवाढ
नाफेड व एनसीसीएफने टप्प्याटप्प्याने या पूर्वी कांदा खरेदीचे दर वाढविले होते. कांदा खरेदीची घोषणा झाली तेव्हा सुरुवातीला प्रतिक्विंटल १,२३५ रुपये दराने खरेदी सुरू करण्यात आली होती. त्यानंतर २६ मे रोजी दर १,५८०, १२ जूनला १,६५०, १९ जूनला १,७३० आणि ४ जुलैपूर्वी १,८७५ रुपये इतका करण्यात आला होता. आता केंद्र सरकारच्या नव्या आदेशानुसार खरेदी दर थेट २,१२५ - रुपये प्रतिक्विंटल झाला आहे.