मुंबई : महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला वेग आला असून, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने सोमवारी रात्री पार पडलेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत पार्थ पवार यांना राज्यसभेच्या रिंगणात उतरवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तसेच, पक्षाची सर्व धुरा सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवत त्यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यावरही शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
प्रफुल्ल पटेल यांच्या मुंबईतील निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची खलबते पार पडली. या बैठकीला सुनेत्रा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित होते. मागील लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पार्थ पवार सक्रिय राजकारणापासून काहीसे दूर होते. मात्र, आता त्यांना थेट दिल्लीच्या वरिष्ठ सभागृहात (राज्यसभा) पाठवून पक्षाने तरुण नेतृत्वाला संधी देण्याचे निश्चित केले आहे. येत्या २६ फेब्रुवारीला वरळी डोम येथे होणाऱ्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांची अधिकृतपणे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घोषणा केली जाईल.
दुसरीकडे, भाजपनेही आपले राज्यसभेसाठी उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आणली आहे. मंगळवारी रात्री १० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'सागर' बंगल्यावर भाजपची महत्त्वाची बैठक होणार असून महायुतीकडून पुन्हा एकदा आरपीआय नेते रामदास आठवले यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे.
भाजपच्या वाट्याला येणाऱ्या उर्वरित तीन जागांसाठी विनोद तावडे, विजया रहाटकर आणि धैर्यशील पाटील यांच्या नावांची जोरदार चर्चा आहे. तावडे यांना राज्यसभेवर पाठवून पक्ष त्यांच्या अनुभवाचा राष्ट्रीय स्तरावर उपयोग करण्याची शक्यता आहे.