

पुणे: महाराष्ट्रात अस्वच्छ अन्नाबाबत सर्वाधिक तक्रारी पुणे जिल्ह्यातून मिळत आहेत, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली आहे.
मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चरतर्फे आयोजित अन्न सुरक्षा परिषदेला उपस्थित राहण्यासाठी हे मुंढे हे शनिवारी आले होते.
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, अन्नपदार्थांशी संबंधित तक्रारी नागरिकांना नोंदवता याव्यात यासाठी एफडीएने अलीकडेच ‘complaints.mahafda.in हे पोर्टल सुरू केले आहे. हे पोर्टल कार्यान्वित झाल्यानंतर हजारो तक्रारींचा ओघ सुरू झाला आणि पहिल्या २४ तासांतच या पोर्टलला १० लाख लोकांनी भेट दिली, असे त्यांनी सांगितले.
राज्यातील तक्रारींच्या वितरणाबाबत विचारले असता ते म्हणाले, ‘सर्वाधिक तक्रारी पुणे जिल्ह्यातून नोंदवल्या गेल्या असून, त्यातील बहुतांश तक्रारी या अस्वच्छ अन्नाशी संबंधित आहेत.’ या नवीन व्यवस्थेमुळे उत्तरदायित्व आणि पारदर्शकता येईल, असेही ते म्हणाले.
संबंधित विभागाचे एफडीएचे सहआयुक्त नोंदवलेल्या तक्रारीची २४ तासात दखल घेतील. त्यांना ही तक्रार एका अधिकाऱ्याकडे सोपवावी लागेल. त्यांनी विहित मुदतीत आवश्यक ती कारवाई न केल्यास, ती तक्रार आपोआप विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याकडे वर्ग केली जाईल. मुंढे यांनी हॉटेल्स आणि इतर प्रतिष्ठानांना अन्न सुरक्षा व्यवस्थापन प्रणालींचे पालन करण्याचे आवाहनही केले.
कारवाई केलेल्या संस्थांवर नजर ठेवणार
मुंढे म्हणाले की, ज्या संस्थांवर भूतकाळात कारवाई करण्यात आली आहे, त्यांची नोंद ठेवण्यासाठी एफडीए ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या पर्यायावर विचार करत आहे.