गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांच्या गाडीला रविवारी (दि. १३) राजापूरमध्ये भीषण अपघात झाला. राजापूर तालुक्यातील हातिवले येथील अंकिता पॅलेससमोर फोर्स अर्बेनिया वाहनाचा अपघात झाला. या वाहनातून सुमारे १५ प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी ८ ते १० जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातानंतर स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केलं.
अंकिता पॅलेससमोर वाहन भिंतीवर आदळलं
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून गणेशोत्सवासाठी कोकणातील गावी निघालेले हे प्रवासी राजापूरच्या हातिवले परिसरातून जात होते. यावेळी चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्याने फोर्स अर्बेनिया रस्त्यालगतच्या भिंतीवर आदळल्याचं सांगितलं जात आहे. धडक इतकी जोरदार होती की वाहनाच्या पुढील भागाचं मोठं नुकसान झालं.
या वाहनातून प्रवास करणारे सर्व प्रवासी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील कुणकावळे येथील असल्याची माहिती समोर आली आहे.
स्थानिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केलं
अपघाताची माहिती मिळताच हातिवले परिसरातील स्थानिक तरुण घटनास्थळी पोहोचले. त्यांनी वाहनातील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदत केली. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
दरम्यान, राजापूर पोलिसांनीही घटनास्थळी पोहोचून पंचनामा सुरू केला आहे. अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याचा तपास सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार चालकाचं नियंत्रण सुटल्याने दुर्घटना घडल्याचं सांगितलं जात असलं, तरी अधिकृत निष्कर्ष तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
गणपतीसाठी कोकणाकडे चाकरमान्यांची मोठी गर्दी
दरवर्षी गणेशोत्सवासाठी मुंबई, पुणे, नाशिकसह राज्याच्या विविध भागांतून लाखो चाकरमानी कोकणाच्या दिशेने रवाना होतात. यंदाही गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने भाविक गावी निघाले आहेत. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली असून, इंदापूर आणि माणगाव परिसरात १० किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी दोन ते तीन तास लागत आहेत. दुसरीकडे, कोकणाकडे जाणाऱ्या काही एक्स्प्रेस गाड्यांनाही विलंब होत आहे. अशा परिस्थितीत राजापूरमधील या अपघातामुळे गणेशोत्सवासाठी गावी निघालेल्या चाकरमान्यांच्या प्रवासाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.