

शिर्डी: एकेकाळी शस्त्रास्त्रांची आयात करणारा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारताला पुढील २५ ते ३० वर्षांत जगातील सर्वात मोठा शस्त्र निर्यातदार देश बनण्यापासून कोणतीही ताकद रोखू शकत नाही, असा ठाम विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी व्यक्त केला.
शिर्डी येथे एका दारुगोळा उत्पादन कारखान्याचे उद्घाटन केल्यानंतर राजनाथ सिंह बोलत होते. संरक्षण क्षेत्रातील उत्पादनात खासगी क्षेत्राचा वाटा ५० टक्क्यांपर्यंत नेण्याचे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
संरक्षण क्षेत्रात खासगी क्षेत्र हे केवळ नट-बोल्ट पुरवठा करण्यापुरते मर्यादित राहिलेले नाही, तर ते आता अत्याधुनिक शस्त्रप्रणालींचे उत्पादन देखील करत आहेत, असे संरक्षणमंत्री म्हणाले.
जेव्हा सरकारची दूरदृष्टी आणि खासगी क्षेत्रातील नाविन्यपूर्ण संशोधन (इनोव्हेशन) एकत्र येतात, तेव्हा देश प्रगतीची नवी शिखरे सर करतो, असे सिंह यांनी नमूद केले. तसेच भारताला दारूगोळा आणि ऑटोमेशनचे प्रमुख केंद्र बनवण्यासाठी सर्वांनी मिळून काम करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.