गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक असताना कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या प्रवासात एक धक्कादायक घटना घडली. रत्नागिरी जिल्ह्यातील कशेडी बोगद्याजवळ मुंबईहून मालवणकडे निघालेल्या खासगी बसला अचानक आग लागली. या भीषण आगीत संपूर्ण बस जळून खाक झाली असली तरी सुदैवाने प्रवाशांचा जीव वाचला.
चालकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवासी सुखरूप
ही घटना मध्यरात्री दोनच्या सुमारास घडली. बसमध्ये ४० ते ४५ प्रवासी प्रवास करत होते. आग लागल्याचे लक्षात येताच बसचालकाने तातडीने वाहन रस्त्याच्या कडेला घेतले व सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र बसमधील प्रवाशांचे सर्व सामान या आगीत जळून खाक झाले.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच खेड नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली आणि आगीवर नियंत्रण मिळवले. नंतर प्रवाशांना पर्यायी वाहनांची व्यवस्था करून गावी रवाना करण्यात आले.
या आगीचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे सगळे प्रवासी सुखरूप बचावले हे विशेष.