Red Alert: सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मुंबईला 'रेड अलर्ट', शाळा-महाविद्यालयांना सुट्टी

Monsoon Update: हवामानाची स्थिती पाहता हवामान खात्याकडून पुढील २४ तासांसाठी दक्ष राहण्यासाठी 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे.
Red Alert: सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मुंबईला 'रेड अलर्ट', शाळा-महाविद्यालयांना सुट्टी
Published on

मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. रस्त्यांवर पाणी साचले होते. सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरले असून त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, मुंबई आणि रायगडमध्ये हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. याशिवाय शाळांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

हवामानाची स्थिती पाहता सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला हवामान खात्याकडून पुढील २४ तासांसाठी दक्ष राहण्यासाठी 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे, तर पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यांसाठी खबरदारीचा 'रेड अलर्ट' देण्यात आला असून विजांच्या कडकडाटासह वाऱ्याचा वेग ५०-६० किमी प्रति तास राहण्याचा अंदाज आहे. मंगळवारी देखील कोकणात सर्वत्र मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या अलर्टनुसार, पुढचे पाच दिवस कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, अंतर्गत कर्नाटक, मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्रात ९ ते ११ जुलैदरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे.

रायगड जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना मंगळवारी सुट्टी

रायगड जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालये ( अंगणवाडी, पूर्व प्राथमिक व प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालय) विद्यार्थ्यांना मंगळवार दि. ९ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे असे आदेश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले आहेत.

मुंबईतील शाळा, महाविद्यालयांना मंगळवारी सुट्टी

भारतीय हवामान खाते (मुंबई) यांच्या वतीने, मुंबई महानगराला अति मुसळधार पावसाचा (रेड अलर्ट) इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी मुंबई महानगरातील सर्व व्यवस्थापनांच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालयांना दिनांक ९ जुलै २०२४ रोजी सुट्टी जाहीर केली आहे.

धोक्याची पातळी

गेल्या २४ तासात झालेल्या मुसळधार पावसाने रायगडमधील कुंडलिका नदी आणि ठाण्यातील काळू नदी धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचली आहे.

दरम्यान, अति मुसळधार पावसाचा इशारा लक्षात घेता, नागरिकांना विनंती करण्यात येते की, कृपया सर्वांनी सतर्क रहावे. आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे. तसेच प्रशासनाच्या माध्यमातून वेळोवेळी देण्यात येणार्‍या सुचनांचे पालन करावे. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी घाबरून न जाता महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचा मदत सेवा क्रमांक १९१६ यावर संपर्क साधावा.

logo
marathi.freepressjournal.in