
पोलादपूर/वार्ताहर : महाडच्या दिशेने येणारी एसटी बस शनिवारी दुपारी ४.३० वाजण्याच्या सुमारास ब्रेक निकामी झाल्याने ५० फूट दरीत कोसळली. या अपघातात १५ प्रवासी जखमी झाले आहेत. भोर-महाड मार्गावर वरंध घाटात हा अपघात झाला. वरंध गावच्या जवळ असलेल्या एका तीव्र वळणावर असताना हा अपघात झाला.
या घटनेची माहिती मिळताच, स्थानिक पोलीस, बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बसमधील प्रवाशांना बाहेर काढले. त्यांना उपचारासाठी महाड येथील ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, राज्याचे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.
पुणे आणि रायगड जिल्ह्यांना जोडणाऱ्या वरंध घाटाचे काम नुकतेच करण्यात आले आहे. वरंध घाट ते रायगड जिल्हा हद्द या दरम्यान संरक्षक भिंत आणि रस्ता दुपदरीकरणाचे काम पूर्ण केले. अरुंद रस्ता आणि खोल दरी असल्याने या ठिकाणी काम करणे आव्हानात्मक ठरत असल्याने हे रुंदीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या वर्षी काही महिने या मार्गावरील वाहतूक बंद करून ठेवण्यात आली होती. हे काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली होती. धोकादायक वळणे कमी करणे, संरक्षक भिंती उभारणे आदी कामे केली. त्यामुळे या मार्गावरील वाहनांचा वेग मात्र वाढला आहे. मात्र यामुळे चालकांची बेपर्वाई वाढली असून, अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.