यावर्षी पावसाने चांगलाच हाहाकार मांडला आहे, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कमी-जास्त प्रमाणात पाणी साचल्याने किंवा पूरजन्य परिस्थिती उत्भवताना दिसत आहे. याव्यतिरिक्त एकीकडे मुंबई आणि उपनगरात संततधार पाऊस सुरू आहे तर दुसरीकडे मुंबईच्या समुद्रालाही पूर आला आहे. मुंबईतील समुद्राची पातळी सध्या 4.47 मीटरने वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने मुंबईकरांना समुद्रकिनाऱ्यांवर न जाण्याचे आवाहन केले. मुसळधार पाऊस पडल्याने पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाची परिस्थिती पाहता मुंबईकरांनीच घराबाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनाने केले. मुंबईत रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्टच्या दिवशी प्रशासनाने मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांवर जाण्यास लोकांना मज्जाव केला आहे.
रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्टच्या दिवशी सकाळी 6 ते 10 या वेळेतच लोकांना समुद्रकिनाऱ्यावर जाण्याची परवानगी असेल, त्यानंतर कोणीही समुद्रकिनाऱ्यावर जाऊ नये, अशा सूचना महापालिका प्रशासनाने दिल्या. यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यत किमान 10 जणांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
माहीम, दादर, परळ आणि भायखळा परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबईत पुढील दोन दिवसांसाठी हवामान खात्याने 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे. मुंबईतील पावसाचा आतापर्यंत मुंबई लोकल सेवेवर कोणताही परिणाम झालेला नाही. लोकल सेवा सुरळीत सुरू आहे.