Mumbai : स्थायी, सुधार, शिक्षण, बेस्ट समितीसाठी आज अर्ज दाखल होणार

मुंबई महापालिकेतील आर्थिक व्यवहार, पालिकेच्या विविध कामांसाठी कोट्यवधी रुपयांच्या तरतूद केली जाते ती स्थायी समितीच्या माध्यमातून. चार वर्षांनंतर स्थायी समिती अध्यक्ष पदी भाजपचा चेहरा दिसणार आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : मुंबई महापालिकेतील आर्थिक व्यवहार, पालिकेच्या विविध कामांसाठी कोट्यवधी रुपयांच्या तरतूद केली जाते ती स्थायी समितीच्या माध्यमातून. चार वर्षांनंतर स्थायी समिती अध्यक्ष पदी भाजपचा चेहरा दिसणार आहे. मात्र ऐनवेळी भाजप कोणाला अध्यक्षपदी विराजमान करणार हे गुलदस्त्यातच आहे. दरम्यान, स्थायी, सुधार, शिक्षण समितीसह बेस्ट समितीच्या अध्यक्षपदासाठी बुधवार, १८ फेब्रुवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत नामनिर्देशन अर्ज सादर करता येणार आहेत.

मुंबईच्या महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर १६ फेब्रुवारी रोजी स्थायी, सुधार, शिक्षण, बेस्ट समिती सदस्यांची नावे महापौर रितू तावडे यांनी सभागृहात जाहीर केली. आता स्थायी, सुधार, शिक्षण, बेस्ट समिती अध्यक्षपदाची निवडणूक २० फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे. यासाठी बुधवारी नामनिर्देशित दाखल करण्याची अंतिम तारीख आहे.

भाजप सेनेच्या युतीत भाजपकडे स्थायी आणि शिक्षण समिती भाजपकडे राहणार असून, बेस्ट समिती शिंदे सेनेला मिळणार आहे. मात्र अद्याप सुधार समिती कोणाकडे याचा निर्णय मंगळवारी रात्री उशिरा झाल्याचे समजते.

शिक्षण समितीत राजेश्री शिरवाडकर यांचं नाव सध्या चर्चेत आहेत. राजश्री यांचं नाव महापौरपदाच्या शर्यतीत होतं, मात्र त्यांना महापौरपदाने हुलकावणी दिल्या नंतर आता त्यांची शिक्षण समितीवर वर्णी लागणार असल्याची चर्चा आहे.

महापौर आपले मानधन देणार महापौर निधीला

गरीब व गरजू रुग्णांना महापौर निधीतून मदत केली जाते. महापौर निधी ५ हजारांपासून ५० हजारांपर्यंत करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन महापौर रितू तावडे यांनी सभागृहात दिले होते, तर आता महापौर निधीस स्वतःचे मानधन देण्याचे जाहीर केले असून अधिकारी, कर्मचाऱ्यांसह नागरिकांनी महापौर निधीस मदत करावी, असे आवाहन महापौरांनी केले आहे. मुंबईची महापौर म्हणून मला मिळणारे मानधन महापौर निधीला देत असून माझ्यासहित नगरसेवकांनी, पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महापौर निधीला आर्थिक मदत करून गोरगरीब रुग्णांच्या आरोग्य सेवेत खारीचा वाटा उचलावा,असे आवाहन त्यांनी केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in