

मुंबई : गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असलेली मुंबई महानगरपालिका निवडणुकीची घोषणा सोमवारी दुपारी होण्याची शक्यता असल्याने मुंबईतील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
सत्ताधारी भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने 'नवशक्ति'ला सांगितले की, राज्य निवडणूक आयोग सोमवारी दुपारी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकांच्या तारखा जाहीर करू शकते. मुंबई मनपाच्या २२७ जागांसाठी शेवटच्या निवडणुका फेब्रुवारी २०१७ मध्ये झाल्या होत्या.
भाजप, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांचा समावेश असलेली महायुती जागावाटपावरून मतभेद असले तरी निवडणुका एकत्रितपणे लढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, विरोधी मविआला मनसेबाबत अडचणींचा सामना करावा लागत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मनसेसोबत संयुक्तपणे निवडणूक लढवू इच्छित असताना, काँग्रेस मात्र उत्तर भारतीय मतांच्या नुकसानाची भीती व्यक्त करत सावध भूमिका घेत आहे.