मुंबईकरांच्या आरोग्यावर परिणाम होतोय; बांधकामाची वेळ निश्चित करा! महापालिका ठराव मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवणार

वाढते वायू प्रदूषण, बांधकामामुळे होणारा आवाज या सगळ्याचा परिणाम आता मुंबईकरांच्या आरोग्यावर होऊ लागला आहे. त्यामुळे सकाळी ६ ते रात्री १० बांधकामाची ही वेळ निश्चित करा, असा ठराव मुंबई महापालिका राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवणार आहे.
मुंबईकरांच्या आरोग्यावर परिणाम होतोय; बांधकामाची वेळ निश्चित करा! महापालिका ठराव मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवणार
Published on

मुंबई : वाढते वायू प्रदूषण, बांधकामामुळे होणारा आवाज या सगळ्याचा परिणाम आता मुंबईकरांच्या आरोग्यावर होऊ लागला आहे. त्यामुळे सकाळी ६ ते रात्री १० बांधकामाची ही वेळ निश्चित करा, असा ठराव मुंबई महापालिका राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवणार आहे.

मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासह नवीन इमारतींचे बांधकाम सुरू असून ठिकठिकाणी रस्त्याची कामे सुरू आहेत. त्याशिवाय अन्य बांधकामेही सुरू आहेत. या प्रकल्पांसाठी सध्याच्या ध्वनिप्रदूषण नियमानुसार पहाटे ६ ते रात्री १० या वेळेत बांधकाम करण्याची परवानगी आहे. परंतु विकासक व कंत्राटदार अशा विहित वेळेनंतरही आपली कामे सुरूच ठेवतात. त्यामुळे शहराच्या प्रदूषणातही वाढ होत आहे पण त्याचबरोबर आरोग्यविषयक समस्यांनाही मुंबईकरांना सामोरे जावे लागत आहे.

पालिका, पोलिसांकडे तक्रारी

सतत सुरू असलेल्या बांधकामांबाबत शेकडो तक्रारी मुंबई महापालिकेच्या विभाग कार्यालयासह पोलीस ठाण्यात दाखल करण्यात येतात. परंतु विकासात व अधिकाऱ्यांमध्ये दडलेल्या अर्थकारणामुळे कारवाई होत नाही. रात्री उशिरापर्यंत बांधकामासाठी वापरण्यात

येणाऱ्या यंत्राचा आवाज, कामगारांचा गोंगाट यामुळे वृद्ध, लहान मुले आणि आजारी व्यक्तींच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो. यासाठी मुंबईतील पुनर्विकास व पायाभूत प्रकल्पांच्या बांधकामाच्या ध्वनिप्रदूषण नियमानुसार सध्याच्या वेळेत बदल करून बांधकामासाठी सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेत परवानगी देण्यात यावी, अशी मागणी भाजपच्या नगरसेविका अलका केरकर यांनी केली आहे.

सरकारच्या निर्णयावर मुंबईकरांचे आरोग्य अवलंबून

बांधकामाच्या वेळेत बदल करण्यासाठी मुंबई महापालिका सभागृहात ठरावाची सूचना सादर करण्यात आली आहे. या ठरावाच्या सूचनेवर महापालिका सभागृहात चर्चा करून वेळेत बदल करण्याचा ठराव मंजूर करण्यात येणार आहे. हा ठराव मंजूर झाल्यानंतर तो महापालिका प्रशासनामार्फत राज्य सरकारच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे या ठरावावर राज्य सरकार काय निर्णय घेणार यावर मुंबईकरांचे आरोग्य अवलंबून आहे.

logo
marathi.freepressjournal.in