सोमवारपासूनच मुंबईत पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मुंबईमधील अनेक भागांमध्ये एव्हाना पाणी भरायला सुरुवात देखील झाली. साहजिकच याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर मोठया प्रमाणावर झालेला दिसत आहे. सखल भागात साचलेल्या पाण्यात वाहन चालवताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.
चेंबूर भागात अनेक ठिकाणी रस्त्यांचे नद्यांमध्ये रूपांतर झाले आहे. कुर्ला हायवे जंक्शन रोड, चेंबूर स्टेशन परिसर, चेंबूर सबवे येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. याचा परिणाम रस्ते वाहतुकीवर झाला आहे. घाटकोपर येथील खंडोबा टेकडीवरील पंचशील नगरमध्ये घर कोसळले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी घराचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेच्या वेळी घरात पाच जण उपस्थित होते. मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम ते जोरदार पाऊस पडेल, अशा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता आहे.