IIT मुंबईतील विद्यार्थ्याची आत्महत्या; परीक्षेत ChatGPT वापरल्याचा आरोप, प्रशासनाविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन

प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे द्यावीत आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाय करावेत, असे विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.
IIT मुंबईतील विद्यार्थ्याची आत्महत्या; परीक्षेत ChatGPT वापरल्याचा आरोप, प्रशासनाविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन
IIT मुंबईतील विद्यार्थ्याची आत्महत्या; परीक्षेत ChatGPT वापरल्याचा आरोप, प्रशासनाविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन(Photo-X)
Published on

मुंबई : आयआयटी (IIT) मुंबईच्या २२ वर्षीय बीटेक विद्यार्थ्याने शुक्रवारी (दि. १८) पवईतील वसतिगृहात आत्महत्या केल्याची घटना घडली. साहिल रवींद्र वाकोडे असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून, तो एनर्जी सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागात द्वितीय वर्षात शिकत होता. परीक्षेदरम्यान मोबाईल वापरून प्रश्नपत्रिका चॅटजीपीटीवर अपलोड केल्याचा आरोप झाल्यानंतर त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले असून, प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे.

परीक्षेत मोबाईल वापरल्याचा आरोप

माहितीनुसार, साहिल हा मूळचा यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी होता. तो पवई येथील आयआयटी मुंबईच्या वसतिगृह क्रमांक ४ मध्ये राहत होता. शुक्रवारी तो परीक्षा देत असताना परीक्षकाला तो मोबाईल फोन वापरत असल्याचे दिसले. त्याने उत्तरे शोधण्यासाठी प्रश्नपत्रिका चॅटजीपीटीवर अपलोड केली होती, असे आयआयटी मुंबईने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

मात्र, या प्रकरणी साहिलवर कोणतीही शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली नव्हती, असे संस्थेने स्पष्ट केले. संबंधित शिक्षक आणि विभागप्रमुखांनी त्याच्याशी चर्चा केली. त्याचे समुपदेशनही करण्यात आले. या घटनेचा त्याच्या शैक्षणिक कारकिर्दीवर परिणाम होणार नाही, असे त्याला सांगण्यात आले होते.

वसतिगृहातील खोलीत आत्महत्या

चर्चेनंतर साहिल वसतिगृहातील आपल्या खोलीत परतला. काही वेळाने त्याने मित्रांचे फोन न उचलल्याने त्यांना चिंता वाटली. मित्रांनी त्याच्या खोलीत जाऊन पाहिले असता दरवाजा आतून बंद होता. त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी साहिल खोलीत मृतावस्थेत आढळला. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. मात्र, तेथे कोणतीही आत्महत्येपूर्वीची चिठ्ठी सापडली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

विद्यार्थ्यांचे आंदोलन

साहिलच्या मृत्यूची माहिती मिळताच आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले. या घटनेची सविस्तर चौकशी करावी, अशी त्यांची मागणी आहे. प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे द्यावीत आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाय करावेत, असे विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.

काही विद्यार्थ्यांनी परीक्षा प्रभारी, संस्थेचे संचालक आणि एनर्जी सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागातील प्राध्यापकांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी केली. संबंधित अधिकाऱ्यांनी जबाबदारी स्वीकारावी, अशीही मागणी करण्यात आली.

आंदोलनात सहभागी असलेल्या प्रणय नावाच्या विद्यार्थ्याने प्रशासनाकडून उत्तरदायित्व आणि पारदर्शकता अपेक्षित असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांशी गैरवर्तन किंवा कठोर वर्तन करणाऱ्या प्राध्यापकांच्या भूमिकेचीही चौकशी व्हावी, अशी मागणी त्याने केली.

मात्र, सर्वच विद्यार्थ्यांनी प्रशासनाला थेट दोष देण्याची भूमिका घेतलेली नाही. अंश नावाच्या विद्यार्थ्याने या घटनेकडे 'प्रशासन विरुद्ध विद्यार्थी' असा संघर्ष म्हणून पाहू नये, असे आवाहन केले. सध्या सर्वांनी एकत्र राहून या घटनेमागील सत्य समोर आणण्याची गरज असल्याचे त्याने सांगितले.

साहिलच्या आईचा संस्थेवर आरोप

साहिलच्या मृत्यूनंतर त्याची आई शनिवारी पोलिस ठाण्यात पोहोचली. आपल्या मुलाला त्रास देण्यात आला होता आणि त्यातूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलले, असा आरोप तिने केला. साहिल हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता. तो आत्महत्या करण्यासारखे पाऊल उचलणारा नव्हता, असे त्याच्या पालकांनी सांगितले.

'आम्हाला न्याय मिळेपर्यंत आम्ही पाठपुरावा करू,' अशी भूमिका पालकांनी घेतली आहे.

सात महिन्यांतील तिसरी घटना

गेल्या सात महिन्यांत आयआयटी मुंबईच्या पवई परिसरात विद्यार्थ्याच्या आत्महत्येची ही तिसरी घटना असल्याचे सांगण्यात येत आहे. फेब्रुवारीमध्ये द्वितीय वर्षातील एका विद्यार्थ्याचा वसतिगृहात मृत्यू झाला होता. त्यानंतर जुलैमध्ये बीटेकच्या द्वितीय वर्षातील २० वर्षीय विद्यार्थ्याचाही आत्महत्येमुळे मृत्यू झाला होता.

या घटनांमुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. विद्यार्थ्यांना आवश्यक मदत आणि समुपदेशन अधिक प्रभावीपणे मिळावे, अशी मागणीही पुढे येत आहे.

पोलिसांकडून तपास

या प्रकरणी पवई पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पोलिसांनी साहिलचा मोबाईल फोन ताब्यात घेतला आहे. त्याच्या घटनेपूर्वीच्या हालचालींचा तपास केला जात आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहे.

पोलिस उपायुक्त दत्तात्रय नलावडे यांनी तपास सुरू असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी आयआयटी प्रशासन आणि विद्यार्थ्यांमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

साहिलने हे टोकाचे पाऊल नेमके कोणत्या परिस्थितीत उचलले, परीक्षेतील घटनेनंतर त्याच्याशी काय चर्चा झाली आणि त्यानंतर काय घडले, याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in