LPG टँकर 'ग्रीन सान्वी' मुंबईकडे मार्गस्थ; होर्मुझ सामुद्रधुनी पार करणारे सातवे भारतीय जहाज

मध्य पूर्वेतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी दिलासादायक माहिती समोर आली आहे. 'ग्रीन सान्वी' एलपीजी टँकरने होर्मुझ सामुद्रधुनी पार केली असून हे टँकर मुंबईकडे मार्गस्थ आहे.
LPG टँकर 'ग्रीन सान्वी' मुंबईकडे मार्गस्थ; होर्मुझ सामुद्रधुनी पार करणारे सातवे भारतीय जहाज
LPG टँकर 'ग्रीन सान्वी' मुंबईकडे मार्गस्थ; होर्मुझ सामुद्रधुनी पार करणारे सातवे भारतीय जहाज
Published on

मध्य पूर्वेतील सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक जहाजवाहतुकीवर परिणाम होत असतानाच भारतासाठी दिलासा देणारी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. भारताकडे येणाऱ्या एलपीजी टँकर 'ग्रीन सान्वी'ने रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाची असलेली होर्मुझ सामुद्रधुनी यशस्वीरित्या पार केली असून, हे जहाज सध्या मुंबईकडे मार्गस्थ आहे.

मरीन ट्रॅफिकच्या लाईव्ह ट्रॅकिंगनुसार, भारतीय ध्वज असलेले हे जहाज सुमारे ४६,००० मेट्रिक टन द्रवरूप पेट्रोलियम वायू (एलपीजी) घेऊन येत आहे. 'मित्सुई ओ.एस.के. लाईन्स' या कंपनीच्या मालकीचे हे जहाज आहे.

तणावातही सातवे भारतीय जहाज पार

मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे समुद्री वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात निर्बंध आले असताना 'ग्रीन सान्वी' हे होर्मुझ सामुद्रधुनी पार करणारे सातवे भारतीय ध्वजधारी व्यापारी जहाज ठरले आहे. विशेष म्हणजे, ही सर्व सातही जहाजे एलपीजी टँकर्स आहेत.

पर्शियन गल्फमध्ये अजूनही १७ भारतीय जहाजे सक्रिय

उपलब्ध शिपिंग डेटानुसार, होर्मुझ सामुद्रधुनीच्या पूर्वेकडील पर्शियन गल्फ परिसरात सध्या किमान १७ भारतीय ध्वजधारी जहाजे कार्यरत आहेत. यामध्ये एलपीजी वाहक, कच्च्या तेलाचे टँकर्स, एलएनजी टँकर, केमिकल टँकर, कंटेनर जहाजे, बल्क कॅरियर्स तसेच देखभालीसाठी थांबवलेली जहाजे यांचा समावेश आहे.

याशिवाय 'ग्रीन आशा' आणि 'जॅग विक्रम' ही आणखी दोन भारताकडे येणारी एलपीजी टँकर्स येत्या काही दिवसांत होर्मुझ सामुद्रधुनी पार करण्याची अपेक्षा असून, त्यामुळे इंधन पुरवठ्यावरील चिंता आणखी कमी होण्याची शक्यता आहे.

भारतासाठी एलपीजी पुरवठा महत्त्वाचा

मध्य पूर्वेतील संघर्षामुळे जागतिक ऊर्जा पुरवठा साखळीवर मोठा परिणाम झाला आहे. भारत मोठ्या प्रमाणावर आयात होणाऱ्या एलपीजीवर अवलंबून असल्याने या परिस्थितीचा देशावर विशेष परिणाम होत आहे. याच पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने इराणसोबत राजनैतिक स्तरावर सक्रिय संवाद वाढवला आहे, जेणेकरून भारतीय जहाजांना सुरक्षित मार्ग उपलब्ध होऊ शकेल.

इराणची स्पष्ट भूमिका

इराणने नुकतेच स्पष्ट केले आहे की, भारतासह जे देश शत्रुत्वाच्या भूमिकेत नाहीत, त्यांच्या जहाजांना समन्वयाने होर्मुझ सामुद्रधुनीतून मार्ग दिला जाईल. इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनीही भारत, चीन, रशिया, इराक आणि पाकिस्तानसारख्या मैत्रीपूर्ण देशांसाठी ही जलवाहतूक मार्गिका सुरूच राहणार असल्याचे सांगितले आहे.

logo
marathi.freepressjournal.in