Mumbai : किरकोळ वादातून MBMT बसचालकाला बेदम मारहाण; गुन्हा दाखल, CCTV फुटेज व्हायरल

मिरा-भाईंदरमधील घोडबंदर मार्गावरील गायमुख घाटात किरकोळ वादातून MBMT बसचालकावर काठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचं CCTV फुटेज व्हायरल झालं असून आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किरकोळ वादातून MBMT बसचालकाला बेदम मारहाण, CCTV फुटेज व्हायरल
किरकोळ वादातून MBMT बसचालकाला बेदम मारहाण, CCTV फुटेज व्हायरल
Published on

मिरा-भाईंदरमध्ये रस्त्यावर झालेल्या किरकोळ वादातून बसचालकावर झालेल्या मारहाणीची धक्कादायक घटना समोर आली आहे. घोडबंदर मार्गावरील गायमुख घाट परिसरात मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या (MBMC) बसचालकाला काही जणांनी काठ्यांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला असून, या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

किरकोळ वादातून हिंसाचार

माहितीनुसार, ही घटना दुचाकी आणि बस यांच्यातील 'ओव्हरटेक'वरून झालेल्या किरकोळ वादातून घडली. 'एनडीटीव्ही इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार, ५ ते ६ अज्ञात व्यक्तींनी बसचालकाला घेरत त्याच्यावर हल्ला चढवला. सुरुवातीला वादावादी झाली, मात्र काही क्षणातच परिस्थिती चिघळून मारहाणीत रूपांतर झालं.

बसमध्ये घुसून चालकाला मारहाण

समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये संबंधित हल्लेखोर बसमध्ये घुसून चालकाच्या केबिनमध्ये जात असल्याचं दिसतं. काही जणांच्या हातात काठ्या असून त्यांनी चालकाला बेदम मारहाण केली. चालकाचा शर्ट फाडून त्याला जबरदस्तीने सीटवरून ओढून बाहेर काढण्यात आलं आणि बसबाहेरही मारहाण सुरूच ठेवण्यात आली.

व्हायरल सीसीटीव्ही व्हिडिओ

गुन्हा दाखल; पोलिस तपास सुरू

पीडित चालकाच्या तक्रारीवरून कोपरी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात भारतीय दंड संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

रूट क्रमांक १७ वर घटना; चालक संपावर

ही घटना मिरा रोड रेल्वे स्थानक ते काशीमिरा येथील विनय नगर दरम्यान धावणाऱ्या रूट क्रमांक १७ वर घडल्याची माहिती आहे. संबंधित दुचाकीस्वार बसला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात होता, त्यावेळी चालक रामेश्वर बिडवे यांच्या बसने अडथळा आल्याने वाद सुरू झाला. पुढे एस.के. स्टोन सिग्नलजवळ हा वाद वाढत मारहाणीत बदलला.

या घटनेनंतर आरोपीवर कारवाईच्या मागणीसाठी बसचालकांनी अचानक संप पुकारल्याची माहिती आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत बससेवा ठप्प राहून प्रवाशांची गैरसोय झाली.

दरम्यान, मिरा-भाईंदर महापालिकेने नियमित कंत्राटदारासोबतचा करार रद्द केल्यानंतर 'महालक्ष्मी कृपा इन्फ्रास्ट्रक्चर' या स्थानिक एजन्सीकडून बससेवा चालवली जात असल्याची माहिती समोर आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in